विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे की, ते महिला आरक्षण 2034 पर्यंत पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. 2023 मध्ये विधेयकाला पाठिंबा देऊनही, आता त्यांना 2029 मध्ये महिलांना आरक्षण नको आहे. हा बुद्धीभेद असून, ते महिलांना खरं आरक्षण देण्यापासून रोखत असल्याचा फडणवीसांनी दावा केला.

काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक महिला आरक्षण विरोधी आहेत. त्यांना 2029मध्ये महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये. 2034 पर्यंत त्यांना महिला आरक्षण रेटून न्यायचं आहे, असा खळबजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच महिला आरक्षणवारून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या दुटप्पीपणाचाही फडणवीस यांनी पर्दाफाश केला. फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते.
काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे नेते हे सातत्याने बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2023 रोजी चिदंबरम यांच्यासहीत सर्वांनी महिला आरक्षण विधेयकावर मतदान केलं होतं. त्या विधेयकात डीलिमिटेशन करावं लागेल आणि डिलीमिटेशन करण्यासाठी नवीन सेन्ससची आकडेवारी झाल्यावर हे विधेयक लागू होईल, असं स्पष्ट म्हटलेलं होतं. हे चिदंबरम यांच्यासहीत सर्वांनी ते मान्य केलं होतं. कोविडमुळे सेन्सस पुढे गेला. मोदींच्या मनात 2029साली महिलांना आरक्षण द्यायचं होतं. त्यामुळे छोटीशी दुरुस्ती आणली होती. संविधान दुरुस्ती आहे, त्याऐवजी त्यात शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे करता येईल अशी दुरुस्ती होती. ती सर्वांनी नाकारली. त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महिलांना आरक्षण द्यायचंच नाही
2023 ला त्यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिला. कारण समर्थन नाही दिलं तरी विधेयक पास होणार आहे माहीत होतं. म्हणून त्यांनी समर्थन दिलं. आता खरं आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा विरोध केला. डीलिमिटेशनचा निर्णय 2023लाच झाला. त्याला काँग्रेसने मतदान करून मान्यता दिली. हा आज आलेला निर्णय दिला. आपल्या राज्यातील लोक त्यावर बोलत आहेत, त्यांनी कोणती नशा केली माहीत नाही. यांच्या मुळे संविधानात डीलिमिटेशन आलं आहे. तेच करण्यासाठी ते अमान्य करतात. 2034मध्ये जाईल म्हणून काँग्रेस पक्ष आणि इतरांना महिलांना 2029मध्ये आरक्षण द्यायचं नाही. त्यांना 2034 पर्यंत हा विषय रेटून न्यायचा आहे. हे लोक बुद्धीभेद करत आहेत. चिदंबरम यांनी ट्विट केलं तेव्हा मी त्याला फॅक्ट फिगर्ससहीत उत्तर दिलं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
रिक्षा चालकांना वेळ वाढवून देऊ
रिक्षाचालकांना मराठीचे एक्सपर्ट बनवायचं नाही. त्यांना कामचलाऊ मराठी आली पाहिजे एवढाच आग्रह आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. त्यांना शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी दोनदा वेळ मागवून घेतला. त्यांना वेळ वाढवून दिला. तिसऱ्यांदा वेळ वाढवून दिला आहे. अजूनही त्यांना वेळ वाढवून हवा असेल तर देऊ. कुणावरही भाषेच्या आधारावर अन्याय होणार नाही. तीन तीन पिढ्यांपासून अनेक लोक मुंबईत राहत आहेत. इथल्या संस्कृतीशी सर्वच एकरूप झाले आहेत. हे सर्व आमचे लोक आहेत. आमच्या संस्कृतीचे लोक आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
कर्जमाफीचा हप्ता वितरीत
दरम्यान, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे पैसे दिले आहेत. 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपये त्यांच्या खात्यात दिले आहेत. दोन टप्पे मिळून 12 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. 10 हजार 115 कोटी रुपये खात्यात गेले. सर्व प्रक्रिया नीट सुरू आहे. जे पात्र शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचं केवायसी होऊन त्यांच्या खात्यात पैसे जातील तोपर्यंत ही प्रक्रिया करू. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांच्या खात्यातही 50 हजार रुपये देऊ, अशी माहिती त्यांनी दिली.
