दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
भाजपच्या बैठकीत महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं असल्याचा दावा काल करण्यात आला. परंतु हा दावा अमित साटम यांनी फेटाळून लावला.

मुंबई महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद झाल्याचा दावा करण्यात येत होता. या बैठकीत महपौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोर वाद झाल्याचा दावा करण्यात येत होता. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेदरम्यान भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भाजपच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या बिनबुडाच्या – अमित साटम
भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित साटम म्हणाले, ‘ ज्यांनी बातमी दिली, ती निराधार आहे. बैठकीत माध्यमांना प्रवेश नव्हता. मी बैठकीचा अध्यक्ष होतो. बैठकीचे मुद्दे तुम्हाला सांगितले. याच्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नाही. कालच्या माध्यमांवरील बातम्या या बिनबुडाच्या बातम्या आहेत. त्याला कोणताही आधार नाही’.
25 वर्षांत जमलं नाही, ते 6 महिन्यात केलं – साटम
‘तुम्ही दिलेल्या बातमीनुसार काही घडलं नाही. झारीतील शुक्राचार्य…महापौरांचा रोख हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर होता. त्याची माहिती काढू शकता. त्याचं स्वातंत्र्य आहे. जे खरं आहे, ते सांगत आहे. प्रशासनातील काही अधिकारी असतील. विरोधी पक्षातील काही नगरसेवक असतील. त्यांचं स्टँडिंगमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्याने अनेकांचा तीळपापड झाला आहे. अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेक जण आमच्या नेत्यांना खासगीमध्ये भेटून आधीसारखं सुरू करा. अशी विनंती करत आहेत. मुंबईकरांना दिलेलं वचन पूर्ण करणार आहोत. किती फेक बातम्या, फेक नॅरेटिव्ह पसरवले तरी पारदर्शकपणे प्रशासन चालवू. कितीही आरोप केले तरी पारदर्शकपणे काम होईल. ही खरेदी संबंधित जेम पोर्टलवर होईल. काही लोकांचा मीटर बंद झाले आहेत. ते पुन्हा सुरू होणार नाहीत. जे 25 वर्षांत कामे झाले नाही, मागील 6 महिन्यात झाले. 1200 कोटी रुपयांचे टेंडर रद्द झालं. जेम पोर्टल आणलं. मुलांसाठी संविधानिक मूल्यांचे शिक्षण दिलं जात आहे. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत, असेही साटम यांनी सांगितले.
