Pramod Kondhare : महिला पोलीस अधिकाऱ्याला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा
Pramod Kondhare : पुण्यातील एका भाजप पदाधिकाऱ्यावर गर्दीचा फायदा घेत महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तिने या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप असलेला भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांने राजीनामा पाठवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला. एका महिला पोलीस निरीक्षकाने प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन गडकरी पुण्यात येणार होते. भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलीसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले.
त्यावेळी प्रमोद कोंढरे यांच्यावर गर्दीचा फायदा घेऊन बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस निरिक्षकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महिला पोलीस अधिकाऱ्याने ही गोष्ट तिच्या वरिष्ठांच्या कानावर घातली. चहाच्या दुकानाजवळच हे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आलं. त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात आली.
भाजप शहराध्यक्षाच म्हणणं काय?
दरम्यान “प्रमोद कोंढरे याने राजीनामा पाठवला आहे. हे नक्की कशामुळे घडलं याची माहिती घेत आहोत. मात्र, काही ठिकाणी गर्दी असते हे अनावधानाने घडलं का? याची माहिती घेवू. पोलीस चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात तपासाअंती कळेल. मात्र मी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना कळल्यानंतर आम्ही तातडीने पाऊल उचलली आहेत. शहर भाजप मध्ये कुठलेही दोन गट नाहीत काहीही बातम्या पसरवू नका” असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले. प्रमोद कोंढरे याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले.
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
“आमच्या पक्षाचा आहे म्हणून प्रमोद कोंढरे याला पाठीशी घालणार नाही. आज सकाळीच मी पुणे शहराध्यक्ष यांच्यासोबत बोलले आहे. त्याला पदमुक्त केलं आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या. “राहुल गांधी यांचे डोके ठिकाणावर नाही आहे. झालेला पराभव ते पचवत नाही आहेत. गेली अडीच वर्ष यांनी नावच ठेवायचे काम केलं आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
