Ajit Pawar : 1 रुपयांचा व्यवहार न करता…पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजितदादांचा तो मोठा दावा, म्हणाले काय?

Ajit Pawar on Mondhava Land : पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण अद्यापही थंडावलेले नाही. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमार्फत झालेला हा व्यवहारच रद्द करण्यात आला असला तरी त्यातून विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी याविषयावर मन मोकळं केलं.

Ajit Pawar : 1 रुपयांचा व्यवहार न करता...पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजितदादांचा तो मोठा दावा, म्हणाले काय?
अजित पवार, पार्थ पवार, मोंढवा जमीन गैरव्यवहार
| Updated on: Nov 09, 2025 | 1:58 PM

Ajit Pawar on Parth Pawar : पुण्यातील मोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजितदादांनी आज बारामतीत माध्यमांसमोर मन मोकळं केलं. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमार्फत जमीन खरेदी व्यवहार रद्द झाला असला तरी त्याअनुषंगाने बरेच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर अजितदादांनी आज मन मोकळं केलं. आपल्यावरही अगोदरच असेच आरोप झाले. त्यातून काही निष्पन्न झालं नाही. मात्र बदनामी झाल्याचं शल्य दादांनी बोलून दाखवले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बारामती आणि आसपासच्या निवडणूक कार्यक्रमाचा आढावा त्यांनी मांडला.

असा कसा कागद होऊ शकतो?

1 रुपयांचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. मी पण आश्चर्यचकीत झालो. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली. काय असं घडलं की त्यानं चुकीचं काम केलं असा सवाल करत याविषयीची वस्तूस्थिती आपल्याला एका महिन्यात कळेल असे दादांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात प्रशासकीय यंत्रणेकडे त्यांनी थेट बोट दाखवले आहे.

निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप

मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असं काहीतरी बाहेर आणलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर 2008 अथवा 2009 मध्ये असंच माझ्याविरोधात 70 हजार कोटींचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकलं नाही. पण आमची बदनामी झाली. आता तर मीडियात प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते आहेत. तेही बोलतात. चुकीची कुणी काही केलं आणि त्याबद्दल बोललं तर समजू शकतो. पण सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामं करायची. पारदर्शकता कशी राहिल ते बघायचं. नियमाला धरून सगळं करायचं. घटनेच्या चौकटीत राहून काम करायंच. चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचं काहीही काढायला लागले. माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही असे अजितदादांनी म्हटले.

मुंबईतही सांगितलं, पुण्यातही आणि आता इथं ही सांगतो की माझ्या नावाचा वापर करून, मग माझे जवळचे नातेवाईक असतील, कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, त्यांनी जरी यदाकदाचित काही सांगितलं, ते जर नियमाला धरून नसेल तर संबंधित अधिकाऱ्याने ते काम करता कामा नये, असा सज्जड दम अजितदादांनी या पत्रकार परिषदेतून दिला. क्लास वन, टू आणि सर्व अधिकारी, आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांनी नियमात न बसणारे काम न करण्याचे आवाहन  अजित पवार यांनी केले.