आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटक येण्यास सुरुवात

| Updated on: Oct 12, 2021 | 10:06 AM

Pune Tourist Points | कोरोना निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने त्यांना गुलाबी थंडीचा आनंद अगदी निर्धास्तपणे लुटता येईल.

आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटक येण्यास सुरुवात
पुण्यातील पर्यटनस्थळांवर पुन्हा निर्बंध
Follow us on

पुणे: रा्ज्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोना निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने त्यांना गुलाबी थंडीचा आनंद अगदी निर्धास्तपणे लुटता येईल.

पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड

मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावर असल्याने पावसाळ्यात पुण्यातील अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनामुळे याठिकाणी निर्बंध लादण्यात आले होते. भुशी डॅम, टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांना माघारी परतावे लागले होते.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील निर्बंध शिथील न होऊनही अनेकजण लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिसांनी पर्यटकांना चांगलाच दणका दिला होता. 31 जुलै आणि 1 ऑगस्टला वीकेंड असल्याने पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी 334 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या माध्यमातून शासनाला 1 लाख 75 हजाराचा महसूल मिळाला होता.

पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला

गेल्या महिन्यात इंजेक्शन सिरींजच्या तुटवड्यामुळे मंदावलेल्या पुण्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा वेग आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या 10 दिवसांमध्येच सहा लाख नागरिकांना लस टोचण्यात आली. पुण्यात आतापर्यंत लसीचा पहिला डोस 88 टक्के , तर दुसरा डोस 49 टक्के जणांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजारांवर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 181 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या सव्वा दोन लाखांच्या आत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 39 लाख 85 हजार 920 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 20 हजार 57 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 50 हजार 963 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 14 हजार 900 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 95 कोटी 89 लाख 78 हजार 49 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज