PMC election 2022 : प्रभाग रचनेतल्या बदलामुळे पुणेकर नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा, विवेक वेलणकरांचा आरोप

| Updated on: Aug 07, 2022 | 12:06 PM

केवळ पैसाच नाही, तर श्रमही आपण पाहायला हवे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यांची नेहमीची कामे सोडून ही कामे केली. नागरिकांनी निवडणुकीच्या निमित्ताने हा सवाल विचारला पाहिजे, असे विवेक वेलणकर म्हणाले.

PMC election 2022 : प्रभाग रचनेतल्या बदलामुळे पुणेकर नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा, विवेक वेलणकरांचा आरोप
प्रभाग रचनेतील बदलावरून विवेक वेलणकरांचे राजकारण्यांना प्रश्न
Image Credit source: tv9
Follow us on

अभिजीत पोते, पुणे : जे चालले आहे, ते अत्यंत वाईच पद्धतीने सुरू आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेवरून (Ward) आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. ते पुण्यात टीव्ही 9 सोबत बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने पुन्हा मोठा बदल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिकेत निवडणूक (PMC election 2022) प्रभाग रचना बदलत तीन सदस्यांचा वॉर्ड केला होता. पण राज्य सरकारने काल पूर्ण नवा निर्णय घेतला आणि पुणे महानगरपालिकेत चार सदस्यांचा प्रभाग असेल, असे नव्याने जाहीर केले आहे. पण सरकारच्या या निर्णय बदलाने पुणेकरांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे ते म्हणाले.

नव्याने सुरू होणार प्रक्रिया

या प्रभाग रचनेतील बदलामुळे पुणेकरांनी भरलेल्या दीड कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे, असे ते म्हणाले. आधी एक, दोन का तीन यावर महिने वाया गेले. मग तीनवर फायनल झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक चारचे पुढे आले आहे. यापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. पण आता सर्व प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने, नव्या नियमांनुसार ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे आधी केलेला दीड कोटी रुपये खर्च हा पाण्यात जाणार आहे.

‘पैसाच नाही श्रमही वाया

केवळ पैसाच नाही, तर श्रमही आपण पाहायला हवे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यांची नेहमीची कामे सोडून ही कामे केली. नागरिकांनी निवडणुकीच्या निमित्ताने हा सवाल विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. राजकारणापुढे काहीही या राजकारण्यांना दिसत नाही, असा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘राजकारणासाठी पुणेकरांच्या पैशाचा बळी’

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावेळी तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी महापालिकेने तीन सदस्य प्रभाग रचना अंतिम झाल्यावर मतदार याद्यांच्या छापाईसाठी 71 लाख, प्रभाग सोडत, आरक्षण सोडत यासाठी 64 लाख रुपये खर्च केले होते. पण आता हा सगळा खर्च वाया गेला आहे आणि राजकारणी लोक केवळ राजकारणासाठी पुणेकरांच्या पैशाचा बळी देत असल्याचा आरोप आता पुणेकर करतात.