
अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला असा देखील आरोप होत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता, या व्हिडीओसोबत ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा सवाल करत त्यांनी नार्वेकर यांना डिवचलं होतं, दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या व्हिडीओवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?
संजय राऊत यांच्या आरोपावर यापूर्वी पण बोललो नाही, आणि बोलणार पण नाही. मी एवढेच सांगू इच्छितो हे त्यांच्या सर्व मनातल्या कल्पना आहेत. हे त्यांचे जुने दुखणे आहे, ते आता उफाळून आले आहे. म्हणून संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे आहेत. अलिबागला मी वारंवार जात असतो. माझ गाव आहे, तिथे माझी शेती आहे. तीथे मी माझी शेती बघायला गेलो होतो. दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला त्यावेळेला तिकडे मारामारी होत होती. म्हणून मी तिकडे सांगितलं की तुम्ही मारामारी करू नका आणि शांतपणे बसून वाद मिटवा, त्या जागेशी माझं काही देणं घेण नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्याची संजय राऊत यांची जुनीच सवय आहे. त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील ते समोर आणू द्या, त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. संजय राऊत यांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही, पण दिडशे वर्षांपासून आमचं अलिबागमध्ये वास्तव्य आहे, आमची तिथे जमीन आहे , त्यांना खोट्या अफवा पसरवायला आवडतात, त्यांना लखलाभ, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये राहून आलेले आहेत, ते लोकांना काय शिकवण देणार? संजय राऊत जेलची हवा विसरलेले आहेत, आसा टोलाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी लगावला आहे.