छत्रीला माईक बनवून ज्योत्स्नाचं खड्डयांवर फिल्ड रिपोर्टिंग, शाळकरी मुलींचा व्हिडिओ तुफान व्हायरल, सरकारला आत तरी जाग येणार आहे का? VIDEO
Maharashtra Potholes Crisis : हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला गंमतीशीर वाटेल, तुम्ही खळखळून हसाल. पण या शाळकरी मुलींनी उपरोधिकपणे राज्यातील या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्रात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महाराष्ट्रात सध्या अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते हे कळतच नाहीय. फक्त वाहन चालकांनाच नाही, तर सर्वसामान्यांना सुद्धा याचा त्रास होतोय. अगदी शाळकरी मुलं सुद्धा याला अपवाद नाहीयत. शाळेत जाणाऱ्या मुलींनी एक गंमतीशीर व्हिडिओ बनवून या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या शाळकरी मुली हातातल्या छत्रीलाच माईक बनवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलल्या आहेत. “हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत की गाड्या जाताना पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा. रिपोर्टर नेहा घारेसह कॅमेरामन मानसी पवार” असं या मुली व्हिडिओमध्ये बोलल्या आहेत.
हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला गंमतीशीर वाटेल, तुम्ही खळखळून हसाल. पण या शाळकरी मुलींनी उपरोधिकपणे राज्यातील या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्रात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते असा प्रश्न पडला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नाशिकमध्ये तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खड्डयांच्या मुद्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुढील आठ दिवसांत नाशिक मध्ये महापालिकेवर काढण्याची तयारी आहे. दोन दिवसांपूर्वीच महापालिकेत खड्याच्या प्रश्नावर पार पडली विशेष महासभा वादळी ठरली होती.
नेम चुकला तोंड फुटलं अशी स्थिती
फक्त नाशिकच नाही, तर पालघर,ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडपासून राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये अशीच स्थिती आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेलं दिसतय. बाईकस्वारांचं छोट्सं दुर्लक्षही मोठ्या अपघाताला कारण ठरु शकतं. नेम चुकला तोंड फुटलं अशी स्थिती आहे. स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. पण दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रातील रस्त्यांची अशीच स्थिती दिसून येते. खड्डे बुजवल्यानंतर एक-दोन पावसाच्या जोरदार सरींनी पुन्हा खड्डे पडतात. रस्त्यांची अशी अवस्था व्हायला प्रामुख्याने भ्रष्टाचार सुद्धा एक कारण आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामाकडे डोळेझाक, दुर्लक्ष यामुळे सुद्धा रस्त्यांची अशी अवस्था होत आहे.
