बरं झालो शिर्डीत हरलो… रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; असं का म्हणाले?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतील पराभवावर विनोदी टोलेबाजी केली. 'बरं झालं मी हरलो, नाहीतर काँग्रेससोबत राहावं लागलं असतं,' असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले. या पराभवामुळेच आपण शिवसेना-भाजपासोबत गेल्याचे ते म्हणाले. सांगलीतील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या टोलेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले. काँग्रेसने आठवलेंसारख्या नेत्याला ताकद न दिल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचेही पाटील म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे. शिर्डीतील पराभवावरून त्यांनी हे विधान केलं आहे. मी काँग्रेस सोबत होतो. काँग्रेसने मला शिर्डीतून तिकीट दिलं. पण बरं झालं मी शिर्डीतून हरलो. नाहीतर आज मला काँग्रेससोबत राहावं लागलं असतं, असा चिमटा रामदास आठवले यांनी काढला. तसेच आपल्याला पाडण्यासाठी की जिंकण्यासाठी तिकीट दिलं हे आजवर मला कळलं नाही, अशी तुफान टोलेबाजीही त्यांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
सांगलीत सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी रामदास आठवले यांनी बिनधास्त टोलेबाजी केली. बरं झालं मी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीत हरलो, नाहीतर मला काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं आणि मी बाहेरच असतो. आत जाता आलं नसतं, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्याला शिर्डीला बोलावलं, पण हरवण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी हे आपल्याला माहीत नव्हतं. मात्र काही प्रचारामुळे शिर्डीची निवडणूक हरल्यामुळे आपण शिवसेना भाजपासोबत गेलो, असं रामदास आठवले म्हणाले.
आठवले आणि पाटलांमध्ये टोलेबाजी
यावेळी रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत. त्यांना सगळया पक्षांनी मदत केली आहे. कोणी वरून केली तर कोणी आतून, असं आठवले म्हणाले. आठवलेंच्या या गुगलीवर विशाल पाटलांनीही षटकार लगावला. महिला विधेयका दरम्यान संसदेत रामदास आठवले यांना बोलू दिले नाही. पण ते बोलले असते तर कदाचित त्यांनी आम्हाला विधेयक समजून सांगितलं असतं. ज्यामुळे आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबू अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली होती, असा खोचक टोला खासदार विशाल पाटलांनी रामदास आठवलेंना लगावला.
आठवलें सारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली
यावेळी विशाल पाटलांनी आठवले यांचं कौतुकही केलं. रामदास आठवलें सारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली. त्यामुळे भाजपासोबत आठवले गेल्याने त्याचा मोठा राजकीय फटका काँग्रेसला भोगाव लागलाय, असं विधान विशाल पाटील यांनी केले. आठवले भाजपा सोबत गेल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसची मूळ वोट बँक दूर गेली. मनाची इच्छा नसताना आठवले हे भाजपा बरोबर गेले. कारण शिर्डीतल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आठवलेंचा पराभव झाला. पण तेच नेते आज भाजपात गेले, असा मिश्किल टोलाही पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचे नाव न घेता लगावला. यावेळी आठवलेंनी विशाल पाटलांना आपण गेल्याने ते आपल्या सोबत आल्याचे सांगितले.