‘उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील’, आमदार रवी राणा यांचा सर्वात मोठा दावा

आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत मैत्री करणार असल्याचा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडत आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.

उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा सर्वात मोठा दावा
Chetan Patil | Updated on: Feb 19, 2024 | 2:37 PM

संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 19 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे. असं असताना आता आमदार रवी राणा यांच्या एका दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मी नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांनी मोदींना साध घातल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता रवी राणा यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे असंच काहीसं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनीही केलं होतं.

रवी राणा नेमकं काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सोबत येतील”, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे मोदींचं नेतृत्व स्वीकारतील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं रवी राणा म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीएत आले. तर उपमुख्यमत्री अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले आहेत”, असादेखील दावा रवी राणा यांनी केला. यावेळी रवी राणा यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहे. संजय राऊत हे दिल्लीत आहेत. पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दल बेगडी आदर आहे”, अशी टीका रवी राणा यांनी केली.

‘शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं’

“शिवजयंती असल्यामुळे महाराष्ट्र सदनात आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. तसेच शिवाजी महाराजांच्या नीतीवर सरकार चालत असल्याचं त्यांनी म्हटलं”, असं रवी राणा म्हणाले. तसेच “अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे असायला हवा. तिथे वारंवार बंदोबस्त दिला जातो. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या सरकारमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाईल”, अशी भूमिका रवी राणा यांनी मांडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us