Mamata Banerjee TMC : निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचं नाव, चिन्ह गोठवलं; आता ममता बॅनर्जी यांच्यापुढे कोणते पर्याय?
TMC party Latest News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेस या पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. पक्षावर दावा करणाऱ्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने नवे निर्देश दिले आहेत. आता या दोन्ही गटांकडे पुढे नेमके कोणते पर्याय आहेत?

पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचं नाव आणि निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली होती. दोन्ही पक्षांनी हा पक्ष आमचाच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता ममता बॅनर्जी आणि ऋताब्रत रॉय यांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह निवडण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली असतानाच निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आला आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडे आता काय पर्याय आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना उद्यापर्यंत 3 नावांचे पर्याय आयोगाकडे देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षाची तीन नावं आणि तीन वेगवेगळी चिन्ह उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यलयामध्ये जमा करावेत अशा स्पष्ट पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहेत.
ममता बॅनर्जींपुढे नेमके काय पर्याय?
दरम्यान, ममता बॅनर्जी यांना सध्यातरी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. कारण राज्यात सध्या पोटनिवडणूक आहे. नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाला सध्यातरी निवडणूक आयोगाचं ऐकावं लागणार आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर पुढे ममता यांना न्यायालयीन लढा देता येणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन गटांचं न्यायालयीन प्रकरण जसं सुरु आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरणही न्यायालयात नेण्याचा पर्याय सध्यातरी दिसत आहे. पण त्यासाठी ममता बॅनर्जी आणि ऋताब्रत रॉय यांना पक्षाची तीन नावं आणि चिन्ह निवडावी लागणार आहेत. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांकडून जी चिन्ह आणि नावे दिले जातील, त्यातील आयोग जी ठरवून देईल ती नावं आणि चिन्ह या पोटनिवडणुकीसाठी वापरले जातील.
विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून ममता दीदींना सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर हळूहळू तृणमूलच्या अनेक आमदार आणि खासदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी वेगळा गट निर्माण केला. पक्षावर दावा सांगितला. यासगळ्यामध्ये ममता दीदींची राजकीय लढाई निवडणूक आयोगाच्या लढाईपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
