Rohit Pawar-Ajit Pawar : अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार ? काकांच्या जाण्याने व्याकूळ झालेल्या रोहित पवार यांचा सवाल
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. बारामतीत अंत्यसंस्कार होताच, अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला. दरम्यान, रोहित पवारांनी ट्विट करत अजित दादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कोण आणि कशी भरून काढणार, हा प्रश्न विचारला आहे. दादांचा जनतेवरील प्रभाव आणि त्यांच्या जाण्याने झालेली हानी यावर त्यांनी प्रकाश टाकला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याचे 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर घडामोडींना मोठा वेग आला. त्यांच्या जाण्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची राष्ट्रवादीने सुरू केली. शनिवारी (31 जानेवारी) सुनेत्रा पवार यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित दादांच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला शॉक बसला आहे, लोक अतिशय शोकाकुल आहेत. प्रत्येक नागरिक दादांच्या अकाली एक्झिटने हेलावला.
दरम्यान अजित पवार यांचे पुतणे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या आठवणींना जागवणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. सध्या राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर रोहित पवार यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे. अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार ? असं प्रश्नच त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे. त्यांची ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे, ती वाचून कोणीही हेलावून जाईल.
रोहित पवार यांचं ट्विट काय ?
रोहित पवार एक्स (पूर्वीचं) वर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट्स करत आहेत. अजित पवार यांच्या आठवणीत ते व्याकूळ झालेत. आजही त्यांनी एक भावूक ट्विट केलं असून त्यात एक महत्वाचा प्रश्नही उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्या शब्दांतं..
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत, पण अजितदादांमुळं त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं. हे अनुभवत असताना मा. अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसतं. म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होतं, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार?
असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त… pic.twitter.com/pI1DRjK1Ge
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2026
