संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, अंबाजोगाई : शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी साखर कारखान्यांनी बँकेतून कर्ज काढल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण अंबाजोगाईतील अंबा सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे पैसे देण्याचं कारण सांगत कारखान्याच्या मालकीची तब्बल 25 एकर जमीन विकली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, जमिनीची विक्री केल्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे जमिनीचे पैसे कुठे गेले? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. महत्वाची बाब म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रमेश आडसकर हे या कारखान्याचे चेअरमन आहेत. (Kalidas Apet’s demand to Sugar Commissioner to suspend the sale of land)
अंबा साखर हा मराठवाड्यातील दोन नंबरचा सहकारी साखर कारखाना आहे. साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच या साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्याच्या कारणाने 25 एकर जमीन विक्री केली आहे. मागील वर्षी या साखर कारखान्यांमध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपीची सगळी रक्कम मिळालेली नाही. विशेष म्हणजे ऊसापासून फक्त साखर बनली असं नाही. तर वेगळे उपपदार्थही बनवले गेले आहेत. तरीही शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत? असा प्रश्न आज शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी विचारलाय.
अंबा सहकारी साखर कारखान्याला 7 जून 2021 रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अटीशर्तीसह शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्यास परवानगी दिली होती. शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबा सहकारी साखर कारखान्याने उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतं. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला तातडीने स्थगिती द्यावी. अशी मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून अनेक कारखान्यांवर कारखाना हस्तांतर करण्याची किंवा कारखाना विकण्याची वेळ अनेकांवर आली आहे. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहे. मात्र, आता थेट जमिनी विकण्याचा पायंडा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आणि शेतकरी नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देण्यासाठी 25 एक जमीन विकली. त्यातील एक रुपयाही दुसरीकडे गेलेला नाही. या पैशातून फक्त शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिलं देण्यात आली आहे. तसंच हा संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे. कारखान्यावर प्रशासक आल्यानंतर बँकेनं कर्ज दिलं नाही. त्यामुळे सभासदांच्या ठेवींमधून हा कारखाना चालू ठेवला. शेतकऱ्यांना नफा व्हावा हा यामागील एकमेव उद्देश असल्याचा दावा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांनी केलाय.
इतर बातम्या :
औरंगाबादेत चालत्या रिक्षात तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या
Kalidas Apet’s demand to Sugar Commissioner to suspend the sale of land