
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 व्या महापौर पदासाठी फिल्डिंग, लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर महापौरपदासाठी भाजपकडून सर्व्हे सुद्धा करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज शहरात आहेत. ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेत आहे. त्याचवेळी महानगरपालिकेच्या महापौर, महापौर, आणि इतर पदासाठी नावावर पण शिक्कामोर्तब होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय सुरू आहे मोठी घडामोड?
महापौर पदासाठी सर्व्हे?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. 57 जागा जिंकून भाजप बहुमतात आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरच नाही तर इतर महत्त्वाची पदं ही भाजपच्याच ताब्यात असेल. महापौर पदासाठी राजू वैद्य, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अनिल मकरिये, विजय औताडे, अप्पासाहेब हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे, अनिल मकरिये या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर महापौर पदी असणारी व्यक्ती कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असावी यासाठी महापौर पदासाठी सर्व्हे सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दानवेंचा भाजपला चिमटा
भाजपाचा संभाजीनगर मध्ये महापौर पदासाठी सर्व्हे सुरू आहे. आपले कार्यकर्ते कसे आहेत. त्याच्या क्षमता काय हे नेतृत्वाला माहीत असतं असं माझं मत आहे. तसं असताना अशा पद्धतीने सर्वे करून निवडणूक उरतात सर्व ठीक आहे. जनतेपर्यंत त्याची काय भावना आहे त्याला महानगरपालिकेची किती माहिती आहे हे गुण त्याला आवश्यक असतात असं मला वाटतं. महापौर पदासाठी सर्वे काय आवश्यक गुण नाही, भारतीय जनता पार्टी असं का करते हे त्यांनाच माहीत, असा टोला उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला.
सर्व्हे करायची गरज काय?
तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची माहिती पक्षाकडे आहे. त्यामुळे सर्व्हे करायची गरज काय असा सवाल करत भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी याविषयीचे सर्व दावे फेटाळले. प्रत्येकाची माहिती पक्षाकडे आहे. त्यामुळे कोण काय काम करतो हे विचारून पाहण्याची गरज नसल्याचे शितोळे म्हणाले. बारीक लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतं. पक्षाची यंत्रणा अत्यंत सक्षम आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याचे बळ, ताकद आणि तो कोणत्या पदासाठी योग्य आहे हे माहिती आहे. त्यामुळे सर्व्हे करण्यात येत नसल्याचे शितोळेंनी स्पष्ट केले . कोअर टीम याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठवेल आणि लागलीच निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. तर दोन दिवसात गट स्थापना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.