मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झालेल्या विकीने मनोज जरांगे यांच्याकडे काय मागणी केली?
मराठा समाजाच्या बैठकीत काल राडा झाला. या राड्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
![मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झालेल्या विकीने मनोज जरांगे यांच्याकडे काय मागणी केली? मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झालेल्या विकीने मनोज जरांगे यांच्याकडे काय मागणी केली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/03/Clash-at-Maratha-Community-Meeting.jpg?w=1280)
मराठा समाजाची काल छत्रपती संभाजी नगर शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा मंदिरमध्ये लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. त्याचवेळी या बैठकीला वादाच गालबोट लागलं. बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आपसात भिडले. अक्षरक्ष: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला.
काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वादावादी झाली, असं बैठकीत सहभागी असलेल्यांनी सांगितलं. आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या तरुणावर छत्रपती संभाजी नगर शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना या तरुणाने टीव्ही नाईन मराठी ला प्रतिक्रिया दिली.
तरुणाला काय अपेक्षा?
“मी सर्वसामान्य कुटुंबातला असून प्रस्थापित लोक मला मारहाण करून दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरंगे यांनी या प्रकरणात लक्ष घालून मला न्याय द्यावा” अशी अपेक्षा या तरुणाने व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
“भांड्याला भांडं लागतच असतं. त्यावर लगेच भूमिका घ्यायची गरज नाही. पण आम्ही दोन्ही बांधवांना बोलवून घेऊ. त्यांचा काय विषय आहे ते समजून घेऊ. दोघांना बोलवून घेऊ. मार्ग निघणार. समाज एकत्र आहे. समाज तुम्हाला एकत्रित दिसणार आणि एकत्र राहणार. आपले मत जर ग्राह्य धरले जात नसेल, आपली किंमत केली जात नसेल, तर आपल्याला एका टोकाच्या भूमीवर यावं लागतं. तुम्ही नाही जिंकत ना आम्ही, तर आम्ही तुमचे पाडू शकतो ही शक्ती मराठे यावेळेस दाखवणार आहेत. मग त्यांना कळेल की, आपण हा नसता जाळ अंगावर घेतला आहे” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दिली आहे.