Sanjay Raut : टिपूच्या नावाने भाजप टिपऱ्या वाजवतोय, संजय राऊत भडकले; ठाकरे गटाची भूमिका विचारताच…

संजय राऊत यांनी टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत असल्याचे ते म्हणाले, तर पूर्वी भाजपनेच टिपू सुलतानला समर्थन देणारे ठराव मंजूर केले होते याकडे लक्ष वेधले. भाजप जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे उकरून काढत असल्याचा आरोप राऊत यांनी केला, तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही भाजपच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sanjay Raut : टिपूच्या नावाने भाजप टिपऱ्या वाजवतोय, संजय राऊत भडकले; ठाकरे गटाची भूमिका विचारताच...
संजय राऊत भडकले
| Updated on: Feb 21, 2026 | 12:01 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टिपू सुलतानचा मुद्दा गाजत आहे. मालेगावचे उपमहापौर निहाल अहमद यांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वाद झाला होता. त्याला भाजपने जोरदार विरोध केला होता. या विरोधात निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर हा वाद थांबला होता. पण आता हा वाद पुन्हा पेटताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या वादावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. टिपूच्या नावाने भाजप टिपऱ्या वाजवत आहे, अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

संजय राऊत आज कोर्टाच्या केस निमित्ताने मालेगावला आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. टिपू सुलतान याच्याविषयी भाजपने नेमलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत केलेले भाषण भाजपच्या लोकांनी ऐकलं पाहिजे. मुंबईसारख्या शहरात सध्याच्या महापौर रितू तावडे आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईतील रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानचे नाव देण्याचे ठराव मंजूर केले आहेत. मिरा भाईंदर असेल, अकोला असेल टिपूच्या नावाने भाजपच्या सत्तेने केलेली ही कामे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

आमची भूमिका…

टिपू सुल्तान महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होते हे भाजपने केलेले ठराव आहेत. आता अचानक त्यांनी ही भूमिका घेतली. त्यांना काय अशी उपरती झाली? छत्रपती शाहू महाराजांनीही टिपू सुलतान बाबत विधान केलं आहे. भाजपला हिंदू-मुस्लिम भांडण लढण्यासाठी कोणतंही कारण लागतं. टिपू सुलतान हा इंग्रजांविरोधात लढला. इंग्रजांविरोधात लढताना मृत्यू झाला हे सत्य आहे. पण त्याच्या जीवनात त्याने काही चुका केल्या. त्याने केलेल्या धर्मांतरासारख्या गोष्टीला कोणी पाठिंबा देणार नाही. पण त्याला पाठिंबा भाजपने दिला आहे. म्हणून टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहेत, असं सांगतानाच टिपू सुलतान मुद्द्यावर आमच्या पक्षाची भूमिका काहीच नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

रेल्वे आणि गृहखात्याने काय केलं?

यावेळी त्यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला. आतापर्यंत भाजपमधून सहा रेल्वेमंत्री झाले. राम नाईक रेल्वे मंत्री होते, नितीश कुमार, सुरेश प्रभू होते. आता अश्विनी वैष्णव आहेत. रेल्वे फ्लाटावरच्या आणि बाजूच्या बांगलादेशींना बाहेर काढण्याबाबत सरकारने काय केले? देवेंद्र फडणवीस किमान तीन वेळा मुख्यमंत्री झाले. त्यापेक्षा अधिक काळ ते गृहमंत्री होते. मग गृहमंत्र्यांनी बांगलादेशी बाहेर काढण्यासाठी काय कारवाई केली? हे समजून घ्या. यायचं आणि ठो ठो बोंबलायचं याला अर्थ काय? सरकार कशासाठी आहे? याच कामासाठी आहे ना? निवडणुका आल्यावर घुसखोरांचा प्रश्न काढतात. एरव्ही काय करता? मुंबईच्या महापौरांनी हा प्रश्न हाती घेतलाय. हे तुमचं काम नाही. गृहखात्याचं काम आहे. अशा प्रश्नावर लक्ष वेधून इतर प्रश्नावरून लक्ष वळवलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Follow Us