
“दोन पक्षांच्या विलिनीकरणाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अजित पवार तो पक्ष चालवत होते. त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. ज्याअर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाहीत. या बाबतीत त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार. कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट मोदींना, महाराष्ट्रात फडणवीसांना सांगितली पाहिजे का? किंवा त्यांना विचारुनच निर्णय घेतले पाहिजेत का? हा हट्ट कशासाठी आहे” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. “हा अनाठायी हट्ट आहे. अजित पवार हे राज्याचे महत्वाचे नेते होते. त्याहीपेक्षा पवार कुटुंबाचे महत्वाचे कर्ते पुरुष होते. त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली असेल. अस होऊच शकत नाही की चर्चा झालीच नाही. असा अट्टहास योग्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डर्टी डील करताना तुमचे मोदी कोणाशी बोलले होते का?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पवार कुटुंबात तीन दिवसाचा दुखवटा असतो. “प्रफुल्ल पटेल यांना पवार कुटुंबियाचं मुखिया केलेय का? हिंदू संस्कृतीप्रमाणे तेरा दिवसांचा शोक असतो. आपण तेरा दिवस पाळतो. शरद पवार ज्या विचारसरणीतून आले आहेत, तिथे कर्मकांडाला महत्व नाही. प्रफुल्ल पटेल हे त्यांची बाजू सांगत आहेत. यावर चर्चा न केलेली बरी” असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष नव्हता
प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “महाराष्ट्राला पटेल असंच करा. मराठी माणसाला जे पटेल तेच करा. अजित पवारांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष नव्हता. त्यांनी चिडचिड करु नये. ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यापेक्षा ते मोदी-शाह यांचे भक्त आहेत. त्यांनी त्यांचं कार्य करत रहावं. अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आहे” असं संजय राऊत म्हणाले.
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजप ही त्यांची प्रायवेट लिमिटेड कंपनी
“त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते अमित शाह आदेश देतील, त्यानुसार ते निर्णय घेतील. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शाह यांनी स्थापन केलेले आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजप ही त्यांची प्रायवेट लिमिटेड कंपनी आहे. त्या कपंनीचे ते शेअरहोल्डर आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार इलेक्शन कमिशन प्रायवेट लिमिटेड भाजप, अमित शहा या दोन लोकांनाच आहे” असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंप्रमाणे स्वत:ची विचारधारा खुंटीला टांगून ठेवली नाही
“अजित पवार यांनी भाजपचा अजेंडा स्वत:वर थोपवून घेतला नाही. ते शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारे नेते होते. ते भाजपसोबत गेले. पण त्यांनी एकनाथ शिंदेंप्रमाणे स्वत:ची विचारधारा खुंटीला टांगून ठेवली नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “काहीही झालं तरी उद्धव ठाकरे चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार नाहीत. तिथल्या नेत्यांना, नगरसेवकांना तशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.