साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीबाबा लढणार?, शरद पवार काढू शकतात हुकूमाचा एक्का; मोठी खेळी होणार ?

| Updated on: Mar 28, 2024 | 12:34 PM

. महायुतीत साताऱ्याची जागा भाजप तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे ही जागा आहे. त्यामुळे या जागेवर कोण उभं राहणार? अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे उदयनराजे भोसले हे महायुतीतून साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी काल शक्तिप्रदर्शनही केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे साताऱ्यातून लढण्याची शक्यता कमी आहे.

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीबाबा लढणार?, शरद पवार काढू शकतात हुकूमाचा एक्का; मोठी खेळी होणार ?
साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीबाबा लढणार ?, शरद पवार काढू शकतात हुकूमाचा एक्का...
Follow us on

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे. पण कोणत्याच राजकीय पक्षाने अद्याप साताऱ्याची जागा जाहीर केली नाही. महायुतीत साताऱ्याची जागा भाजप तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे ही जागा आहे. त्यामुळे या जागेवर कोण उभं राहणार? अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे उदयनराजे भोसले हे महायुतीतून साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी काल शक्तिप्रदर्शनही केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे साताऱ्यातून लढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या जागेवरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार हे पृथ्वीबाबांच्या रुपाने हुकूमाचा एक्का बाहेर काढण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीबाबा अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

शरद पवार काढणार हुकमाचा एक्का ?

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सातारा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे दावे -प्रतिदावे सुरू आहेत. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण या सगळ्यात कराडच्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ‘बाबां’चा लोकसभेला दावा नसतानाही त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील हे प्रतिनिधित्व करीत आहेत. तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून तेही या जागेवर दावा करीत आहेत. तसेच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने अजित पवार गटही या जागेवर दावा करत आहे. सध्या भाजपकडून उदयनराजे भोसले यांचे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील किंवा पुत्र सारंग पाटील तर अजित पवार राष्ट्रवादी कडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव अशी नावे समोर येत आहेत.

पण या सगळ्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठलाही दावा नसताना त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. कारण भाजपाला तोडीस तोड, तुल्यबळ लढत देणारा श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय दुसरा उमेदवार शरद पवार गटाकडे अर्थात महाविकास आघाडी कडे नाही. पण त्यांचे वयोमान पहाता ते निवडणूक लढतील का ? याविषयी शंका आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारी निश्चित करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. म्हणूनच अजून उमेदवार ठरलेला दिसत नाही.
भाजपाचे आव्हान पेलून यशवंत विचारांचा मतदारसंघ ,जिल्हा भाजपाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी शरद पवार हे ऐनवेळी इंडिया आघाडीतून अनुभवी सर्वसमावेशक, सक्षम असे पृथ्वीराज चव्हाण यांचे हुकमी पान बाहेर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा का ?

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी निवडून येतील असे विधान केले होते.त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा होत आहेत. तर सातारा लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहात का या असा प्रश्न चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता. तेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असुन आम्ही या मतदारसंघात भाजपाला घुसू देणार नाही ,आघाडी ताकतीने लढेल असे सांगत उमेदवारी बाबत जरतरच्या गोष्टींवर बोलणे योग्य नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले, पण स्पष्ट नकार दिला नाही. मात्र सातारा जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष व कॉग्रेस ओबीसी सेल प्रदेश अध्यक्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभा उमेदवारी देण्याची मागणी केली आहे

राज्यातल्या राजकारणाची समीकरणे दररोज बदलत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात उभी फूट पडली आहे. नवी आघाडी, नवी महायुती निर्माण झाली आहे. विजयाचे गणित डोळ्यासमोर ठेवूनच उमेदवार निश्चित केला जाणार यात शंका नाही. त्यामुळे सातारच्या रणांगणात नेमकं कोण कोण येणार? हे थोड्या दिवसात स्पष्ट होईलच. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा, राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले आहे.पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,केंद्रीय मंत्री म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे वडील, आई हे सुद्धा खासदार होते. या कुटुंबाला दिल्लीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे .