Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, ‘निव्वळ अशक्य’

| Updated on: May 10, 2022 | 12:08 PM

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले.

Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, निव्वळ अशक्य
15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, 'निव्वळ अशक्य'
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात राज्यात निवडणुका लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानुषंगाने इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी निवडणुकीवरून सुरू असलेल्या अफवांवर भाष्य केलं आहे. येत्या 15 दिवसात निवडणुका (election) होणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या निवडणुका 15 दिवसात का होणार नाहीत? कोर्टाचा नेमका निर्णय काय आणि त्याचा काय अर्थ काय हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या विधानामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांत निवडणुका घ्यायला सांगितल्याचा गैरसमज आहे. ज्या स्टेजला निवडणूक थांबवली, तिथपासून तुम्ही निवडणूक सुरु करा, असं कोर्टानं म्हटलंय. निवडणुकी संदर्भात हरकती मागवल्या तर त्याला एक महिना लागतो. वॉर्ड तयार झाल्यानंतर त्याला महिना लागतो. दोन अडीच, तीन महिने प्रक्रियेसाठी लागणारच आहे. पंधरा दिवसात निवडणुका घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु करा, असं कोर्ट म्हणतंय. निवडणुका घ्या असं म्हणत नाहीये, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

आमच्याच पक्षात एकमत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत आपल्याच पक्षात एकमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका एकत्र लढवाव्यात की नाही यावर अजून काही फारशी चर्चा झालेली नाही. माझ्या पक्षात त्यावर चर्चा झाली. माझ्या पक्षात यावरून दोन मतं आहे. काहींचं मत आहे, प्रत्येकांनं आपआपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर त्यावर एकत्रित बसावं. काहींना वाटतं की आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे आपण एकत्रित निवडणूक लढवली तर ते सरकारसाठीही चांगलं राहील. पण याच्यात अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असं पवार म्हणाले.

तर जाहीरपणे बोलेन

बाकीच्या दोन पक्षांची निवडणुकीबाबत काय भूमिका आहे याची मला माहिती नाही. त्यामुळे यावर थेट वक्तव्य करणं योग्य नाही. एकमेकांची मतं समजल्यानंतर जाहीरपणे बोलेन, असं सांगत पवारांनी यावर अधिक भाष्य केलं नाही.