Sharad Pawar : शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया काय?
Sharad Pawar : महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी तसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीडीपी वाढल्याचा दावा यावर महत्वपूर्ण भाष्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज बोलत होते. “विद्यार्थ्यांच आंदोलन आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी सरकारने स्वीकारलेलं धोरणं कसं चुकीचं आहे? हे न्याय देवतेने स्पष्टपणे सांगितल. न्यायदेवतेने सरकारला कडक शब्दात सल्ला दिला आहे, तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर आम्हाला निर्णय घ्यावे लागतील” असं शरद पवार म्हणाले. शिवसेनेच्या पक्ष, चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “नाही सांगू शकतं. कोर्टाचा निकाल येईल. सुनावणी चालू आहे. संपलेली नाही. त्याआधी आम्ही भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही. काय असेल ते कळेल” असं शरद पवार म्हणाले.
ऑक्टोंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार का? त्यावर शरद पवार म्हणाले की, “येतो म्हणालेत पण तारीख अजून फायनल नाही. 16 ऑक्टोंबरला ते येण्याची शक्यता आहे” “पंतप्रधानांना यावेळी बारामतीत एक प्रेझेंटेशन देण्यात येणार याहे. आपल्या काही लोकांनी त्यांना सुप्रियाच्या मुलीच्या लग्नात प्रेझेंटेशन दिलं होतं. ते त्यांना सविस्तर समजून घ्यायचं आहे” असं शरद पवार म्हणाले. साखरेच्या वाढलेल्या दरांवरही शरद पवारांनी महत्वाचं भाष्य केलं. “साखरेचे दर वाढलेत. पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाहीय. वाढलेल्या दराचा फायदा व्हायला पाहिजे. उत्पादन खर्च वाढतोय. जे पिकवतो त्याचा काही हिस्सा शेतकऱ्याकडे गेला पाहिजे. ते चित्र दिसत नाहीय. साखर आयात करणं योग्य नाही. नवीन आयात केलेल्या साखरेचा फायदा कधी मिळणार हे सांगता येत नाही” असं शरद पवार म्हणाले.
पेरणी सोडा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
पावसाच्या चिंताजनक स्थितीवरही शरद पवारांनी भाष्य केलं. “पावसाने दडी मारली आहे. मी जिथे-जिथे जातोय, पेरणी सोडा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. निसर्गाचं हे चित्र चांगलं नाही. सगळ्यांनी मिळून संकटग्रस्त माणसाला संकाटून बाहेर काढायला हातभार लावला पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.
तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर काय म्हणाले?
तुकाराम मुंढेंनी कारवाई सुरु केल्यानंतर दूधाचे दर वाढले आहेत. जे दूध 60 रुपयांना मिळायचं त्याचा दर आता 80 रुपये झालाय. शेतकऱ्यांना फायदा होतोय या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “दूधातली भेसळ थांबलीय. त्यामुळे उत्पादकता वाढली आहे. चांगलं दूध मिळत असल्याने ग्राहकही दोन पैसे देतायत. हे चांगलं आहे” जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन चाललय. त्यावर सांगितलं की, ‘बघुया आता काय होतय, सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत’
