राज्यातील सर्वात मोठा दरोडेखोर, खिचडीचोर जळगावच्या दौऱ्यावर!; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Uddhav Thackeray Jalgoan Sabha : उद्धव ठाकरे यांचा जळगाव दौरा अन् वादावर भाजप नेत्याचं घणाघात; सामना पाकिस्तान आणि चीनचं मुखपत्र झालंय. दुसऱ्यांच्या घराचे बारसे करण्याची सवय उद्धव ठाकरे व टोळीला झाली आहे, असा घणाघातही त्यांनी केलाय. पाहा काय म्हणाले...

सिंधुदुर्ग| 10 सप्टेंबर 2023 : राज्यातील सर्वात मोठा दरोडेखोर, खिचडी चोर जळगावच्या दौऱ्यावर आहे. प्रशासनाने आदेश देऊन ही शेंबड्या मुलासारखे नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्याने दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात. राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितलं पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. ते पावसात भिजले होते की राऊत ने बिसलेरी ओतलेली हे त्यांनाच माहिती, असं म्हणत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव महानगरपालकेने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम ठेवला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही उद्धव ठाकरे यांनी काही वेळा आधी केलं. त्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे. मात्र या कार्यक्रमावर भाजप आणि शिंदेगटाकडून टीका करण्यात येत आहे.
नितेश राणे यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे. याआधी सिंधुदुर्ग रत्नागिरी ज्यांनी लुटली अशा लोकांवर मी भाष्य करत नाही, असं म्हणत एका वाक्यात अंबादास दानवेांनी उत्तर दिलं आहे.
राजधानी दिल्लीत G20 परिषद होत आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. G20 मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वजन समजणार आहे. संजय राऊतसारख्या नालायक असलेल्यांची भाषा पाकिस्तानचे एजंट असल्यासारखी आहे. या लोकांवर देश द्रोहाचा खटला चालवला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.
अजितदादा पवार यांना किती मोठा समर्थन आहे हे आजच्या दौऱ्यामुळे दिसतंय.राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांना पाठिंबा देतील, असं म्हणत नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोड शोवर प्रतिक्रिया दिली आहे. आमचं सरकार सर्वांना न्याय देईल. भात शेती नुकसान बाबत अहवाल आम्ही मागवला आहे. राज्य सरकार म्हणून जी मदत करता येईल ती करू, असंही राणे म्हणाले.
