Sadabhau Khot: सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं… सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर… त्या कायद्यावर मोठा संताप

Sadabhau Khot Criticized Government: सध्या सरकारच्या काही निर्णयाने समर्थकच व्यथीत झाले आहेत. सदाभाऊ खोत यांनी गोवंशी बंदी कायद्यातील तरतुदीवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. का केली त्यांनी सरकारवर टीका?

Sadabhau Khot: सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं... सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर... त्या कायद्यावर मोठा संताप
सदाभाऊ खोत आक्रमक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 29, 2026 | 11:40 AM

Sadabhau Khot on cow slaughter ban law : ‘मला आता असं वाटतंया की सरकार नावाच्या भिंतीवर डोक खडकावं. डोक फोडून घ्यावं. मग तरी यांना अक्कल येती की नाही. खऱ्या अर्थानं मोठ्या वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. मी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून परतून तालुक्यातून पंढरपूर इथं आलो आहे. कारण माझा शेतकरी भोळा भाबडा आहे. तुम्ही त्याची जनावरं तुरुंगात घालायला निघालात’ अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. गोवंश बंदी हत्या कायद्यातील तरतुदींविरोधात त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. ते पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सदाभाऊंचा सरकारला सज्जड दम

सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं. तर अक्कल येईल. राज्यात प्रथमच शेतकऱ्याची जनावर तुरूंगात गेली. हिंदुस्थानात सत्ता जातीपातीतून मिळते मातीतून नव्हे. सरकारला जातीपातीची मत हवेत शेतकर्‍यांची नव्हे, अशी टीका खोत यांनी केली. सरकारने शेणा मूतात हात घालू नये असा सज्जड दमही सदाभाऊंनी सरकारला दिला. गो वंश हत्या बंदी कायद्याच्या विरोधात आमदार सदाभाऊ खोत आक्रमक दिसले. गोरक्षकांनी शेतकर्‍यांची पकडलेली जनावरे पंढरपुरात पोलिसांच्या ताब्यात आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी जनावरांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर आगपाखड केली.

शेतकऱ्याची जनावरं कैद

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की शेतकऱ्यांची जनावरं कैद झाली. हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. जून महिन्यात पेरणी हंगाम सुरू होतो. मे महिन्यात शेताची डागडुजी होते, मशागत होते. शेतीच्या कामासाठी शेतकरी वेगवेगळ्या बाजारातून बैल खरेदी करतो. बीड जिल्ह्यातून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैल खरेदी करून आणली आहेत. पशूपालनाचा व्यवसाय हा गेल्या हजारो वर्षात विनातक्रार सुरू आहे. शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यातील आपआपसातील हा व्यवसाय आहे. त्यामुळे सरकारनं शेणा-मुतात हात घालायची गरज नाही अशी जोरदार टीका सदाभाऊंनी या कायद्याच्या अंमलबजावणीवरून केली आहे. दारु, गुटखा, अफू याकडे सरकारने लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us