सोलापूरमध्ये भाजपचा नव्याने ‘उदय’; या नेत्यामुळे आता राजकीय समीकरणं बदलली…

| Updated on: Mar 22, 2023 | 12:36 AM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी कायम संपर्कात राहिले असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आता सोलापूरातील राजकीय गणित बदलणार असून त्यांचा भाजपला फायदा काय काय होणार आहे त्याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूरमध्ये भाजपचा नव्याने उदय; या नेत्यामुळे आता राजकीय समीकरणं बदलली...
Follow us on

सोलापूर : राज्यात आणि केंद्रास सत्तेत असणाऱ्या भाजपने पक्षवाढीसाठी बड्या बड्या नेत्यांना पक्षात ओढण्याचे काम जोरदार पणे सुरु करण्यात आले आहे. सोलापुरातील दादा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि युवा नेते उदयशंकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केल्याने आता सोलापूरातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं असल्याचे बोलले जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत उदय शंकर पाटील यांनी मुंबईमध्येच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून उदयशंकर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जोरदारपणे चर्चा सुरू होती. त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचेही भाजपच्या कार्यर्त्यांनी सांगितले.

भाजपचे मिशन 2024 चे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी मागील महिन्यात त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली होती. उदय शंकर पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणातील गणित बदलणार असल्याचेही बोलले जात आहे.

लिंगायत बहुल असलेल्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना पर्याय म्हणून भाजपचा नवा चेहरा उदयशंकर पाटील ठरू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उदयशंकर पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. तसेच उदय शंकर पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेस पासून केली.

उदयशंकर पाटील यांनी युवक काँग्रेसचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र त्यानंतर अंतर्गत गटबाजीतून सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसमधून ते अलिप्त झाले होते.

2004 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर दक्षिण मतदार संघातून उदयशंकर पाटील यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेविरोधात निवडणूक लढवल्याने उदयशंकर पाटील यांची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा झाली होती.

मात्र निवडणुकीसाठी 25 वर्ष पूर्ण नसताना खोटा दाखला बनवून शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविल्याने त्यांच्या विरोधात गुन्हादेखील दाखल झाला.

त्याचबरोबर उदयशंकर पाटील यांनी आर.पी. ग्रुपच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुख नेत्यांपैकी ते एक मानले जातात.

सोलापुरात दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी भव्यदिव्य गणेशोत्सवाद्वारे युवकांचे संघटन बांधले आहे. तर कर्नाटकातील भाजपचे दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधली होती.

त्याचबरोबर नाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी कायम संपर्कात राहिले असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आता सोलापूरातील राजकीय गणित बदलणार असून त्यांचा भाजपला फायदा काय काय होणार आहे त्याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.