राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तसंच वातावरण तयार केलं : सुधीर मुनगंटीवार

| Updated on: Jan 27, 2021 | 5:39 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या आणि किड्यामाकोड्या सारखे शेतकरी मेले", असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला (Sudhirr Mungantiwar on Delhi farmers tractor rally violence).

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तसंच वातावरण तयार केलं : सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar
Follow us on

चंद्रपूर : “प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार व्हावा, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. गोळी चाचली असती तर पुन्हा हेच लोकं अन्नदाता शेतकऱ्यावर गोळी चालवली, असं बोलले असते. मात्र, केंद्र सरकारने जे संयम दाखवले त्याला सलाम आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या आणि किड्यामाकोड्या सारखे शेतकरी मेले”, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला (Sudhirr Mungantiwar on Delhi farmers tractor rally violence).

मावळमध्ये नेमकं काय घडलं होतं?

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मार्च 2019 मध्ये पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार यांनीच पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर गोळी चालवण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, अजित पवारांनी आरोप फेटाळला होता. याशिवाय “मावळच्या आंदोलक शेतकऱ्यांवर मी गोळीबाराचे आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेईन”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

सुधीर मुनगंटीवार आणखी काय म्हणाले?

“दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आलेलं हिंसक वळण हे केंद्र सरकारचं अपयश नाही. ज्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रवेशासाठी परवानगी देण्याबाबतची भूमिका घेतली त्यांचं हे अपयश आहे. सरकारने या आंदोलनात अतिशय संयमाने भूमिका घेतली. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“दिल्लीत ते पुतना मावशीच्या रुपात आलेले काही षडयंत्रकारी लोकं होते. या लोकांनी षडयंत्र केले. 26 जानेवारीचा दिवस निवडला. दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस आयुक्तांनी वारंवार हे आंदोलन 26 जानेवारीला करु नका, असं आवाहन केलं. मात्र, तरीही आंदोलकांनी ऐकले नाही. याउलट परवानगी दिली नाही तर याद राखा, असा गंभीर इशारा दिला गेला”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“26 जानेवारी आमचा पवित्र राष्ट्रीय सण आहे. या राष्ट्रीय सणात विघ्न टाकण्यात आलं. आता आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. जात, पंथ, धर्माच्या पलीकडे जावून निर्णय घेतला पाहिजे. हा संविधानावर हल्ला आहे. काही लोक हा भाजपचा हल्ला होता, असं आरोप करत आहेत. तर मग ठराव करा. जो कुणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजी”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“मी मोदींना याबाबत पत्र पाठवणार आहे. आपण अनेक गोष्टींना सहन करतो. देशासाठी लाखो सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे संविधानाच्या राष्ट्रीय सणामध्ये विघ्न आणणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. या प्रकरणातील खरे सूत्रधार बेनकाब करुन त्यांना चव्हाट्यावर आणण्याचं काम अतिशय वेगाने केलं पाहिजे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?

‘केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी’, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

संबंधित व्हिडीओ: