
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, या लेखामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडेच देणार होतो, पण अजित पवार यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आता अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसेच अदृश्य शक्तिच्या कारवायामुळे राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अजित पवार यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, मात्र झालेली चूक दुरुस्त करायची या विचाराने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दादा कामाला लागले होते, असा मोठा दावा देखील या लेखात शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान शिंदे यांच्या या लेखावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी शशिकांत शिंदे याचा हा दावा फेटाळून लावतानाच त्यांना इशारा देखील दिला आहे. ‘अशावेळी शशिकांत शिंदेंनी असं विधान करायला नको होतं. भाजपसोबत असलं पाहिजे ही दादांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. २०१४मध्ये होती. २०१६ मध्ये देखील इच्छा होती. त्यावेळी चर्चा अंतिम टप्प्यात झाली होती. २०१९ मध्ये तर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं. केंद्राची मदत होऊ शकते असं दादांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी म्हटलं ते अनाठायी आहे. ते वेगळं काही तरी साधू पाहत आहेत. त्यांना नेमकं काय बोलायचं त्यांचं त्यांना माहीत. ते जबाबदार नेते आहेत. पण हे लिहिण्याचं कारण काय? असा सवाल यावर आता तटकरे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे मासिक दर महिन्याला येतं. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मासिक येतं. योगायोगाने ते १२ तारखेला आलं की मुद्दाम १२ तारखेला मासिक बाजारात आलं माहीत नाही, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शशिकांत शिंदेंनी काहीही बोलू नये. अमूक अमूक कारणानं किंवा वैतागून अजितदादांनी निर्णय घेतला असं ते म्हणत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देईन, असा इशाराही यावेळी तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना समोरून प्रस्ताव आला तर चर्चा करू असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.