Ajit Pawar: विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे, शशिकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, लेखातून केला तो मोठा खुलासा

Ajit Pawar Sharad Pawar NCP Merge: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजून एक मोठा खुलासा समोर येत आहे. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या साप्ताहिकामधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दावा केला आहे. काय आहे त्यांचा तो दावा?

Ajit Pawar: विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे, शशिकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, लेखातून केला तो मोठा खुलासा
अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी विलीनीकरण
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 13, 2026 | 12:16 PM

Ajit Pawar Sharad Pawar NCP Merge: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकामधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दावा केला आहे की,विलीनीकरण नंतर आम्ही पक्षाच सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांच स्वप्न पूर्ण करायचं त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विलनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असा अध्यक्षीय लेख शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिक मधे लिहला आहे.

शशिकांत शिंदे यांच्या भावना काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर मोठा विस्तार करण्यात व पक्षाला खंबीर नेतृत्व देण्यात अजितदादा पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, दुःखी झाला. राज्याच्या विकासाचा ध्यास असणारा नेता गेला. शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजकारणाचे आणि सामाजिक कार्याचे धडे घेतलेल्या अजितदादांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे २९ जानेवारी रोजी त्यांच्या अंत्यविधी वेळा संपूर्ण महाराष्ट्र ओक्साबोक्सी रडला, अशी शशिकांत शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

अदृश्य शक्तीच्या कारवाया ,धमक्या व खोट्यानाट्या षडंयत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. पण झालेली चूक आता दुरुस्त करायची या विचाराने दादा गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असा निर्धार करुन ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते. त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती. ते स्वतः हिरारीने प्रचाराची धूरा सांभाळत होते. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असे शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटले आहे.

शरद पवार गटाकडून वारंवार दावा

दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाविषयी शरद पवार गटाकडून वारंवार दावा करण्यात येत आहे. याविषयी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. बैठक झाली. तर या १२ फेब्रुवारी रोजी याविषयीची घोषणा अजितदादा करणार होते, असे जयंत पाटील यांनी माहिती दिली होती.शरद पवार यांनी सुद्धा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान अजितदादांच्या गोटातील नेत्यांनी मात्र याविषयी कानावर हात ठेवले आहे.