भाजपने तोंड उघडायला लावू नये… सुप्रिया सुळेंनी भरला दम; विधान परिषदेतील घोडेबाजारावरून हल्लाबोल
विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन," असा दम त्यांनी दिला. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुळे यांनी लोकशाहीमध्ये घोडेबाजार थांबवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचेही स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचं स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळेच उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर घोडेबाजारावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. मला तोंड उघडायला लावू नका. मी पुरावे देईन, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी माघार आघाडी झाल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. त्याबाबत तुमचं काय मत आहे? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपला इशाराच दिला. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही. तो माझा स्वभाव नाही. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही त्यांच्या विरोधात ताकदीने लढूच. पण आता हा जो घोडेबाजार झाला. कोण काय आणि कसं झालं? हे तुम्हालाही माहीत आहे. मलाही माहीत आहे, असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
निवडणुकीत रंगत नव्हतीच
या निवडणुकीत रंगत आहे असं मला वाटलं नव्हतं. आणि घोडेबाजार इतका जाईल हेही वाटलं नव्हतं. विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेत रंगत येते. तिथे पारदर्शकता येते. राज्यसभेत सर्वांकडे नंबर होते. तिथे बिनविरोध निवडणूक झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नवीन बिल आणणार
विधान परिषद निवडणुकीत 8 ठिकाणी बदल झाले. 8 उमेदवारांनी माघार घेतली. त्यात काँग्रेसचेही आहेत. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. मी स्वत: सुप्रिया सुळे नागरिक म्हणून लवकरच संसदेत बिल आणणार आहे. लवकरच दिसेल. निवडणुकांमधील घोडेबाजार रोखण्यासाठी बिल आणणार आहे. या निवडणुकांमध्ये घोडेबाजाराचा आरोप होतो तो बंद झाला पाहिजे. हात वर करून पार्टीच्या व्हीपने सरपंच ते लोकसभा निवडणूक पारदर्शकतनेच झाली पाहिजे. असं बिल मी आणतेय. पुढच्या काळात हा बदल तुम्हाला दिसेल, असं त्या म्हणाल्या.
घोडेबाजार होऊ नये
घोडेबाजार होऊ नये म्हणूनच मी बिल आणतेय. कोणत्याही इलेक्शनमध्ये घोडेबाजार होऊ नये. पैशाच्या जीवावर निवडणूक लढली जाऊ नये. किंवा इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीची भीती दाखवू नये. हा देश लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. त्यासाठी जे काही करायचं ते आम्ही करू, असंही त्यांनी सांगितलं.
काकडेंना शुभेच्छा
आमच्याकडे 850 मते होती, असं विक्रम काकडे यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात आमची 150 मते होती. विक्रम काकडे लहान आहेत. नुकतेच ते राजकारणात आले आहेत. त्यांच्यावर मी काही बोलू इच्छित नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. बोलू द्या, असं त्या म्हणाल्या.