भल्या पहाटे काळाचा घाला, ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

| Updated on: Sep 12, 2021 | 11:37 AM

ठाण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (2 killed, 1 injured in slab collapse incident at Rabodi thane)

भल्या पहाटे काळाचा घाला, ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी
building collapse
Follow us on

ठाणे: ठाण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज पहाटे ठाण्याती राबोडी परिसरात ही दुर्घटना घडली. (2 killed, 1 injured in slab collapse incident at Rabodi thane)

ठाण्यातील राबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही तळ मजला अधिक चार मजली इमारत आहे. आज पहाटे 6 वाजता सर्वजण साखर झोपेत असतानाच इमारतीच्या तिसऱ्या माजल्यावरील छताचा भाग कोसळला. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. तर अचानक काही तरी पडण्याचा आवाज आल्याने इमारतीतील इतर लोक जागे झाले आणि त्यांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

दोघे दगावले

रमीज शेख (वय 32), गॉस तांबोली ( वय 38) आणि अरमान तांबोली (वय 14) या तिघांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या तिघांनाही प्रचंड मार लागला होता. त्यामुळे उपचारा दरम्यान रमीज शेख आणि गॉस तांबोली यांचा मृत्यू झाला. तर अरमान हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मशिदीत नागरिकांना ठेवले

ही घटना घडल्यानंतर टीडीआरएफची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून ढिगाऱ्याखाली कुणीही अडकलेलं नसल्याचं सांगितलं जातं. तसेच ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून इमारतीतील नागरिकांना जवळच्या मशिदीत हलविण्यात आलं आहे.

उल्हासनगरात 7 जण दगावले

या आधी मेमध्ये उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. उल्हासनगरमधील नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली होती. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली होती. उल्हासनगरमधील नेहरू चौक परिसरात साई शक्ती नावाची एक पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण 29 फ्लॅट्स आहेत. 28 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास या इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब पत्त्यासारखा कोसळून थेट तळमजल्यावर आला. यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. (2 killed, 1 injured in slab collapse incident at Rabodi thane)

 

संबंधित बातम्या:

ठेकेदाराने केडीएमसीला लावला २० कोटींचा चुना; तिघांविरोधात गुन्हा दाखल

CCTV VIDEO | वसई स्टेशनवर वृद्धा चालत्या लोकलसमोर उभी राहिली, आणि…

पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगर हादरलं, रेल्वे स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?

(2 killed, 1 injured in slab collapse incident at Rabodi thane)