अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; ठाण्यात रास्ता रोको; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

| Updated on: Jun 20, 2022 | 3:41 PM

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे.

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; ठाण्यात रास्ता रोको;  मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
अग्निवीर योजनेविरोधात राष्ट्रवादीचा ठाण्यात रास्ता रोका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणेः चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात (Agneepath scheme) राष्ट्रवादी युवक (National Congress Party) आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Housing Minister Dr. Jitendra Awhad) यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला.त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे.

भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक

तसेच या तरूणांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्वद्रूतगती महामार्ग अडविण्यात आला. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा तासानंतर नौपाडा पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

‘नो रँक नो पेंशन’ भाजपचा प्रवास

यावेळी शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितले की, सैनिकांना वन रँक वन पेंशन देतो म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा प्रवास आता “नो रँक नो पेंशन” पर्यंत येऊन थांबला आहे. अग्नीवीर योजनेच्या नावाखाली जो खेळ मोदी सरकारने सुरू केला आहे, तो येणाऱ्या काळात आपल्या देशाला अत्यंत भयानक स्थितीकडे नेवू शकतो. 4 वर्षाची सेवा देऊन बाहेर पडणाऱ्या लोकांच्या नंतर सशस्त्र टोळ्या बनू शकतात. यांचा वापर नंतर सामान्य लोकांच्या विरोधात होवू शकतो किंवा एखाद्या राज्याचं सरकार पाडण्यापर्यंतदेखील होवू शकतो. भविष्यात हे अग्नीवीर आपल्या देशात दहशतवाद्यांच्या हाती लागले तर काय होईल, याची कल्पनाच असह्य होत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

 सेवानिवृत्ती झालेल्या केवळ 3 टक्के लोकांनाच नोकऱ्या

आजही सैन्यदलातून सेवानिवृत्ती झालेल्या केवळ 3 टक्के लोकांनाच नोकऱ्या मिळतात, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत आपल्या आयुष्यातील 4 महत्वाची वर्ष देऊन, बाहेर पडणाऱ्या तरुणांना नंतर नेमकी कोणती काम मिळणार..? याबाबत मोदी सरकारकडे कोणतीही योजना नाही.परिणामी 4 वर्षाच्या सेवेनंतर जेंव्हा भविष्य अंधकारमय दिसेल तेंव्हा शस्त्रास्त्रांची ट्रेनिंग घेतलेली तरुण मंडळी कोणता मार्ग अवलंबवतील याबाबत सांगणे अवघड आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी, अशी मागणी खामकर यांनी केली आहे.

सैन्यात बहुजनांचीच मुलं

उमेश अग्रवाल यांनी, अग्नीवीर प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात, आपल्या गावातला सैनिक जेव्हा शहीद होतो तेव्हा पूर्ण गाव रडतं. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो अशा या देशसेवा करणाऱ्या एका वर्गाचा हा सर्वात मोठा अपमान असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात समीर नेटके, श्रीकांत टावरे, अभिषेक पुसाळकर, साकिब दाते, मैसर शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.