‘तुमच्या नाटकाचा तमाशा जनतेला दाखवेन’ गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा, महायुतीत मीठाचा खडा?
Ganesh Naik on Eknath Shinde: राज्यात भाजप आणि शिंदेसेनेतील कलगीतुरा पुन्हा एकदा दिसला. आज जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. तर दुसरीकडे मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली. त्यांच्या आरोपांनी नवी मुंबईत महायुतीत पुन्हा एकदा मीठाचा खडा पडला.

जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन, आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार तर त्याचा हात धरून लायकी दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केलेय. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असा समज ठेऊन कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल. कोणी आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे अशी खरमरीत टीका गणेश नाईक यांनी केली असून यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत.
बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र मागे नेला
यापूर्वी सानपाडा येथील एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी शिंदे यांच्यावर टीका केली होती. कॉलनीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बांधणी ही पुनर्विकासाऐवजी क्लस्टर योजनेमधून होत असेल तर या शहरासाठी घातक आहे. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेल्याचा आरोप नाईकांनी केली. तर यापूर्वी नाईकांनी भाजपने परवानगी दिली तर त्यांचा टांगा पलटी करून टाकू, त्यांचे नामोनिशाणा मिटवून टाकू असा दम भरला होता. गेल्या तीन चार वर्षात नाईकांनी शिंदेवर जहरी टीका केली आहे.
नाईकांवर पाटकरांची टीका
शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष किशोर पाटकरांची क्लस्टरवरून वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका या लोकांना फक्त बिल्डरांना घाबरायचं आहे. त्यामुळे ते भीती निर्माण करतात. 12 हजार अनधिकृत घरे नवी मुंबईत आहेत. तेव्हा पालकमंत्री होते मग का नाही थांबवलं. यांचा दुटप्पी धोरण आहे. आमच्या नेत्यांचा हे नाव घेत नाही यापुढे जर नाव घेतलं तर आम्ही देखील त्यांचं नाव घेऊ त्यांचा इतिहास किती काळा आहे हे आम्हाला माहित आहे. यांचा सगळ बाहेर काढू. 25 वर्ष यांच्या हातात सत्ता होती तेव्हा यांनी आतापर्यंत काही केलं डीपी प्लॅन मध्ये कमीत कमी मेट्रो तरी टाकायला हवी होती ते देखील टाकलं नाही, असे पाटकर म्हणाले. या नवीन वादामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.