कल्याण : कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात आज दुपारपासून जोरदार पावसा (Heavy Rain)ने हजेरी लावली आहे. गेल्या तीन तासापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास (Water Logging) सुरूवात झाली आहे. डोंबिवली नांदीवली, कल्याण पूर्वेकडील मलंग रोड आडीवली ढोकली परिसर यंदाही जलमय झाला आहे. काही सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. आडीवली ढोकली समर्थ नगर ऑस्टिननगरमधील चाळींमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात नाले (Drainage) रुंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पाण्यात दिवस काढवे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तर डोंबिवलीमधील नांदीवली परिसरत देखील पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमाननगर नजीकचा टेकडीवरुन दरड कोसळल्याची घटना सायंकाळी घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने घटना घडलेल्या परिसरातील पाच कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरल्याने सखल भागातील नागरिक धास्तावले आहेत.
अंबरनाथ शहरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अंबरनाथ पश्चिमेचा विमको नाका या प्रमुख चौकात कल्याण कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली गेला आहे. या महामार्गावर साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांची वाट काढताना तारांबळ उडत आहे. यापूर्वीही आलेल्या मोठ्या पावसात हा महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. (Heavy rains in Kalyan-Dombivali, Chawls in Adivali Dhokli area went under water)