Eknath Shinde : ग्रामीण जनतेचे जीवन प्रकाशमय करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
महाराष्ट्र हे ऊर्जा क्षेत्रात संपूर्ण देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. राज्यातील औद्योगिक व कृषी व्यवसायाला नेहमीच पूरक असे ऊर्जा धोरण राबविण्यावर राज्य शासन प्रयत्नशील आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वीज वितरण सुधारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ठाणे : “हर घर जल”प्रमाणेच “हर घर ऊर्जा” हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. शहापूर येथील उर्जा (Power) महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छा (Wishes) संदेशात त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहापूर येथील महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाच्या सभागृहात ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @2047’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनी चित्रफीतीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, महावितरणचे कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकिय संचालक चंद्रकांत डांगे, महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक वेलुरी बालाजी उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ ठाणे जिल्ह्यात नाही, तर राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांनी प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
प्रिपेड – स्मार्ट मीटरचा सुमारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा
महाराष्ट्र हे ऊर्जा क्षेत्रात संपूर्ण देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. राज्यातील औद्योगिक व कृषी व्यवसायाला नेहमीच पूरक असे ऊर्जा धोरण राबविण्यावर राज्य शासन प्रयत्नशील आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वीज वितरण सुधारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे विज गळती आणि वितरणातील हानी कमी होईल, त्याचप्रमाणे राज्यातील ग्राहकांसाठी प्रिपेड – स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. याचा सुमारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांनादेखील मीटर बसविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात केंद्रीय योजनांची कामे रखडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सचिवांना दिल्या आहेत. राज्यात पुढील काळात केंद्र आणि राज्य भागिदारीच्या योजना वेगाने मार्गी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गावांना सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण – कपिल पाटील
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले की, वीज वाहिन्या भूमिगत टाकण्याबाबत केंद्र शासनाची सागरतटीय राज्यातील शहरांसाठी असून या योजनेचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यातील महावितरणने याबाबत केंद्र शासनाला प्रस्ताव द्यावा. या योजनेचा विस्तार झाल्यास वीज वाहिन्या भूमिगत करता येतील आणि त्यामुळे पावसाळ्यात त्रास होणार नाही. तसेच वीजचोरीही रोखता येईल. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून शहापूरला 9 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणने जनजागृती अभियान घेण्याचे आवाहनही पाटील यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला सौरऊर्जेचा मंत्र दिला आहे. गावांना सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे 160 ग्रामपंचायती सक्षम असून त्या प्रस्तावित नवीन योजना राबवून ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण बनू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी प्रास्ताविक केले. शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांचा यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील विविध योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती सादर करण्यात आली. (On the occasion of Amrit Mahotsav of Independence organized a special program at Shahapur)