
राज्यातील महापालिका निवडणुकांची धामधूम अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी काल गुरुवारी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले. ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम (EVM) मशीन सील करून त्या स्ट्राँगरूमकडे नेण्याची प्रक्रिया सुरू होती. याच वेळी अपक्ष उमेदवार भूषण भोईर हे मतदान केंद्रात शिरले आणि त्यामुळे वादाला तोंड फुटले. ईव्हीएम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न होत आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या. या संशयावरून दोन्ही बाजूचे शेकडो समर्थक आमनेसामने आले. या गोंधळात मतपेट्या घेऊन जाणारी बस अडवण्यात आली. काही वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या मदतीने सौम्य लाठीमार केला.
या राड्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दावा केला की, भूषण भोईर यांनी मुद्दाम बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे आणि हत्यारे आणली होती. एखाद्याचा बळी घेण्याचा हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे, भूषण भोईर यांच्या समर्थकांनी असा आरोप केला आहे की, शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी भोईर यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान प्रभाग ३ मध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे भूषण भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष पॅनल उभे केले आहे. प्रचारादरम्यान मीनाक्षी शिंदे यांची आगरी समाजाबद्दलची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासूनच या भागात ठिणगी पडली होती. मतदानाच्या दिवशीही पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यातच आता झालेल्या या वादामुळे हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे.
दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत मीनाक्षी शिंदे यांची भेट घेतली. बोगस मतदानाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले की, सर्व मतपेट्या आता स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित आहेत आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवले जात आहे. आजची मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.