T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणी
टी20 वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीचे चार संघ ठरले आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यापैकी दोन संघ अंतिम फेरीत जाणार आहे. असं असताना कोणते दोन संघ अंतिम फेरीत भिडतील, याची भविष्यवाणी दिग्गज क्रिकेटपटूंनी आधीच केली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या दोन सामन्यातील विजेत्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 4 मार्चला, भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 5 मार्चला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला होणार आहे. 8 मार्चला अंतिम फेरीत कोणते दोन संघ भिडणार याची उत्सुकता लागून आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीचा निकाल काय लागणार? याबाबत अजून तरी काही सांगता येत नाही. असं असताना दिग्गज क्रिकेटपटूंनी भाकीत वर्तवण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा यांनी अंतिम फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे.
मोहम्मद युसूफ आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्या मते, अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होईल. त्यामुळे आतापासून क्रीडाप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कारण टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभूत केलं होतं. तसेच दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका लढत झाली तर हा सामना अतितटीचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मोहम्मद युसूफ आणि ग्लेन मॅक्ग्रा यांचं भाकीत खरं ठरतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
भारताची या स्पर्धेतील कामगिरी ठिकठाक राहिली आहे. साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही. पण सुपर 8 फेरीत दिग्गज संघांचं आव्हान पेलताना नाकी नऊ आले. आता इंग्लंडचं आव्हान उपांत्य फेरीत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हाय स्कोअरिंग सामना असेल यात काही शंका नाही. पण नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावेल हे मात्र तितकंच खरं आहे.
