IND vs ENG: श्रेयस परवडला पण शुभमन नको, गिलने मालिका गमावण्यासाठी जे खेळाडू संघातही नाही त्यांना जबाबदार धरले
भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका रंगली जी भारतीय संघाने गमावली. आता मालिका गमावल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने पराभवाची कारणं सांगितली आहे.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावल्यानंतर आता वनडे मालिकाही गमावली आहे. आधी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला अपयश आले आणि आता शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला अपयश आले. इंग्लंड दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत 2-1 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या पराभवानंतर आणि मालिका गमावल्यानंतर, कर्णधार शुभमन गिलने पराभवाची अनेक कारण सांगितली. गिल पराभवावर केलेल्या विधानाची आता खूप चर्चा रंगली आहे.
इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वीच, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला क्वाड्रिसेप्स दुखापत झाल्यामुळे मालिकेतून बाहेर पडावे लागल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. हार्दिकला ही दुखापत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झाली, जिथे तो पाठीच्या दुखापतीतून सावरत होता. हार्दिकच्या जागी नितीश रेड्डीचा संघात समावेश करण्यात आला, प नंतर त्याला मांडीला दुखापत झाली. दौऱ्यादरम्यान हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने जखमी खेळाडूंची यादी आणखी वाढली. यानंतर, जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्याला मुकला.
शुभमन काय म्हणाला?
इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “तुम्ही आमची सुरुवातीची निवड पाहिली तर, किमान पाच खेळाडू आजच्या सामन्यात खेळत नव्हते. जेव्हा एक खेळाडू दुखापतग्रस्त असतो, तेव्हा तुम्हाला वेगळे संयोजन खेळवावे लागते. जर दोन खेळाडू दुखापतग्रस्त असतील, तर तुम्हाला वेगळे संयोजन वापरावे लागते. मला वाटते की जर प्रत्येक सामन्यानंतर एक खेळाडू बाहेर होत असेल, तर आपल्या संघात कुठेतरी काहीतरी कमी आहे. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, आम्हाला सलग 11 सामने खेळायचे आहेत. आणि इथे, खेळाडू दोन-तीन सामन्यांची मालिकासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे, कुठेतरी नक्कीच कमतरता आहे. ते एक-दोन सामने खेळतात, मग जखमी होतात, आणि आम्हाला अशा संयोजनाने खेळावे लागते ज्याचा आम्ही विचारही केला नव्हता. त्यामुळे, जर तुम्हाला सकाळी कळले की एखाद्या खेळाडूला अडचण आहे, तर गोष्टी अवघड होतात. मग परिस्थिती अशी होते की, ‘तुम्हाला धोका पत्करायचा आहे का?’
इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने व्यथित झालेल्या गिलने सांगितले, “जर तुम्ही एका सामन्यात पाच गोलंदाजांसह खेळत असाल आणि त्यापैकी एक पाच षटके टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला, तर तुम्ही गोलंदाजीसाठी कोणाला घेणार? हे अवघड आहे. या गोष्टी लक्षात घेऊन, आम्हाला आमची तंदुरुस्ती सुधारण्याची गरज आहे. जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करायला यायचे, तेव्हा आम्हाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल असे वाटायचे. जेव्हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करायचे, तेव्हा काहीतरी घडू शकते असे आम्हाला वाटायचे. अतिरिक्त फिरकी गोलंदाज न खेळवता त्याऐवजी वेगवान गोलंदाज खेळवण्यामागे हेच कारण होते, कारण मधल्या षटकांमध्ये तुम्हाला दबाव निर्माण करून विकेट घेण्याच्या संधी मिळतात का हे पाहायचे असते.”
