महिलांचे केस कापून अर्धनग्नावस्थेत काढली धिंड; उल्हासनगरमधील संतापजनक घटना, नेमकं काय घडलं?

उल्हासनगरमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील काही महिलांचे केस कापून, त्यांच्या गळ्यात चपलांची माळ घालून, त्यांचे कपडे फाडून अर्धनग्नावस्थेत रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

महिलांचे केस कापून अर्धनग्नावस्थेत काढली धिंड; उल्हासनगरमधील संतापजनक घटना, नेमकं काय घडलं?
उल्हासनगरमधील संतापजनक घटना
Image Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 9:45 AM

उल्हासनगरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प 3 परिसरात पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून झालेल्या वादातून काही पुरुषांनी एकाच कुटुंबातील महिलांना निर्घृणपणे मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्या महिलांचे केस सर्वांसमोर कापण्यात आले आणि त्यांच्या अंगावरील कपडेसुद्धा फाडण्यात आले. अर्धनग्नावस्थेत त्यांच्या गळ्यात चपलांची माळ घालून त्यांची रस्त्यावरून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत धिंड काढण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हा संपूर्ण वाद उल्हासनगरच्या वाघरी नगर परिसरात घडला.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, काही काळापूर्वी स्थानिक जात परिषदेनं एका पीडितेच्या कुटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार टाकणारा आणि त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालणारा एक जुलमी फतवा काढला होता. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी हा सामाजिक अन्याय स्वीकारण्यास नकार दिला. घटनेच्या दिवशी मंदिराच्या आवारात एक धार्मिक कार्यक्रम आणि भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पीडितेच्या कुटुंबातील एका तरुणाने निर्बंधाना विरोध करत “आमची काय चूक आहे? आम्ही मंदिरात का येऊ शकत नाही”, असं म्हणत मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तिथे उपस्थित असलेल्या वाघरी समाजातील काही सदस्यांना या तरुणाचं हे वागणं खटकलं.

तरुणाच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी काठ्या आणि सळ्या घेऊन पीडितेच्या घरात घुसून पुरुषांना निर्दयपणे मारहाण केली. इतकंच नव्हे तर याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचे परिणाम आणखी वाईट होतील, अशी धमकी त्यांना देण्यात आली. यानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तक्रारदार कांता प्रेम राजपूत, त्यांची बहीण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह हल्ल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनकडे जात होत्या. तेव्हा वाटेतच हडकमाता चौकाजवळ आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी महिलांना रस्त्यावर ओढलं, त्यांचे कपडे फाडले आणि कात्रीने त्यांचे केस कापले. इतकंच नव्हे तर महिलांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांनी रस्त्यावरून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या विठ्ठलवाडी स्टेशन संकुलापर्यंत धिंड काढली. यादरम्यान आरोपीने पीडितांना अनेक लोकांच्या पायांना स्पर्श करण्यासही भाग पाडलं.

तीव्र संताप आणणारी ही संपूर्ण घटना घडली तेव्हा रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. पण त्या असहाय्य महिलांच्या मदतीसाठी एकही व्यक्ती पुढे आली नाही. पीडित कुटुंबीय जेव्हा विठ्ठलवाडी पोलिसांत पोहोचले, तेव्हासुद्धा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही आणि सौम्य गुन्हे दाखल केले, असा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपी जुली वाघरी, विनू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बालू वाघरी, महेश वाघरी आणि इतरांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आणि इतर आरोपी अद्याप फरार आहेत.

Follow Us