शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती

| Updated on: Nov 29, 2021 | 11:35 AM

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने पुन्हा एकदा जगाला धडकी भरवली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे.

शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबईः कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूने पुन्हा एकदा जगाला धडकी भरवली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. पुढच्या काळात या विषाणू आणि रुग्णांमध्ये झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत काहीही निर्णय तूर्तास झालेला नसल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

पंतप्रधानांशी चर्चा करणार

नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग घेणार आहे. यामध्ये सर्व मंत्र्यांचे म्हणणे होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदर नियमावलीबाबत चर्चा करावी.

दुबईची नियमावली

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत एक नियमावली तयार केली. तशीच नियमावली महाराष्ट्रमध्येही असावी याबाबत चर्चा झाली आहे. मंत्र्यानी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी आणि कशी नियमावली ठरवता येईल, याचा निर्णय घ्यावा.

सरकारसमोर पेच

सध्या राज्यभरात माध्यमिकच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या 1 डिसेंबरपासून प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय होता. त्याला हिरवा कंदीलही दाखवण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सगळ्यांमध्ये भीती निर्माण केली आहे. राज्य सरकराने नवी नियमावली जाहीर केली आहे. हे पाहता शाळा सुरू करायच्या की नाही, हा पेच पुन्हा एकदा सरकारसमोर निर्माण झाला आहे.

नियमपालन अवघड

शाळा सुरू करायच्या म्हटले तर काटेकोर नियम पालन करावे लागेल. शाळांचे रोजच्या रोज निर्जंतुकीकरण करावे लागेल. शिवाय सुरक्षित अंतराचे पालन. हे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ आहे. अनेक शाळांचे वर्ग मोजके आहेत. त्यात या नियमांचे पालन करणे तसे पाहता अवघड आहे. दूरदृष्टीचा विचार करून शाळांनी आपल्या पातळीवर कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे कोरोनाची साथ वाढताच पुन्हा एकदा शाळांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

इतर बातम्याः

संदीप-सलीलची मैफल कंपूगिरी म्हणत ट्रोल; एकाच गल्लीतील कार्यक्रम म्हणून हिणवणे सुरू, नेमकं कारण काय…?

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण