शेतकऱ्यांचा वापर ठाकरे गटाकडून राजकारणासाठी केला जातोय, किरण पावसकर यांनी कसं ते सांगितलं
शिल्लक कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्याचं हे काम त्यांना करावं लागणार आहे.
मुंबई – चिखली येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सभेनंतर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर म्हणाले, सभा बघीतली. ही शिल्लक सेना आहे. जे काही उरलं त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं जातंय. त्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला जातो. निसर्गाकडून शेतकऱ्यांना त्रास झाला. स्वतः मुख्यमंत्री असताना काही केलं नाही. आता राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याचा वापर केला जातोय, असा आरोप किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. आपल्यातील शिल्लक असलेल्या सेनेत प्राण भरण्याचं काम केलं जातंय, असंही ते म्हणाले.
किरण पावसकर म्हणाले, असं शिल्लक कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्याचं हे काम त्यांना करावं लागणार आहे. कारण शिंदे आता सत्तेवर आल्यानंतर अनेक वर्षे हेच काम करण्यासाठी ठेवलंय. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, असा ठाकरे गटाचा कार्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला, यात कुठंही दुमत नाही. त्याबाबत कुणालाही क्षमा केली जाऊ नये. पण, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला त्यांच्याबरोबर आपल्या मुलाला पाठवून भारत जोडोसाठी हातात हात धरून फिरत असाल, तर ही दुटप्पी भूमिका आहे.
उद्धव ठाकरे यांच्याविषयी समाजामध्ये सत्यता दिसून आली आहे. देवदेवतांची विटंबना करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. कामाख्या देवीच्या मंदिरात मी स्वतः जाऊन आलो, असंही त्यांनी सांगितलं.
चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत केली नसल्याचा पुनरुच्चार केला. आम्ही मदत देणार होतो. पण, आमच्याशी गद्दारी केली. सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले. ओला दुष्काळ जाहीर केला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.