एकीकडे उल्हास नदीला पूर तर दुसरीकडे कल्याणमध्ये पाणी बंदी ! बदलापूर,टिटवाळा-अंबरनाथ येथे पूराचा धोका..

राजमाची ते कल्याण अशी जोरदार पावसाने बॅटींग केल्याने उल्हास नदीचा प्रवाह मोठा झाला आहे. त्यामुळे कल्याण ते टिटवाळा-अंबरनाथ येथे पूराचा धोका निर्माण झाला आहे.तसेच नदीने गाळ आणल्याने कल्याणचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

एकीकडे उल्हास नदीला पूर तर दुसरीकडे कल्याणमध्ये पाणी बंदी ! बदलापूर,टिटवाळा-अंबरनाथ येथे पूराचा धोका..
The Ulhas River is in flood
| Updated on: Jul 06, 2026 | 10:05 PM

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेली काही दिवस पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली.पाण्यात बुडून, गटारात पडून, झाडे कोसळून नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. पावसाने मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गावरील वाहतूक बाधित झाली असताना आता उल्हास नदीला मोठा पूर आल्याने कल्याण, उल्हासनगर आणि टिटवाळा येथील नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. उल्हास नदीचा गाळ मोहने उदंचन केंद्रातील पंपाच्या स्ट्रेनरला साचल्याने कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

उल्हास नदीतील गाळाचा फटका बसून आता कल्याण पूर्व-पश्चिमचा पाणीपुरवठा तब्बल 12 तासांसाठी बंद राहणार आहे. उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढल्याने मोहने उदंचन केंद्रातील पंपांच्या स्ट्रेनरला गाळ आणि कचरा साचला आहे. त्यामुळे पंपांचा फ्लो कमी झाल्याने तातडीच्या दुरुस्ती आणि स्वच्छता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर काम सुरु केले आहे.नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.तसेच पावसाने बदलापूरमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका वाढला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी उलांडण्याची भिती आहे. त्यामुळे सखल भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजमाची ते कल्याण खाडीपर्यंत उल्हास नदीचा वेग भयावह झाला आहे. त्यामुळे उल्हास नदीकाठच्या गावांना हाय-अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाकडून स्थलांतराची तयारी करण्यात आली आहे. अशाच पाऊस कायम राहिल्यास कल्याण, टिटवाळा आणि आंबिवलीत पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

शिवमंदिराचा रस्ता बंद

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीला मोठा पुर आला आहे. त्यामुळे प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. पुलांवरून पाणी गेल्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. अंबरनाथ शहर आणि परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेरून वाहत असून नदीचे पाणी मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्यावरून गेल्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद करण्यात आले आहेत. नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत शिवमंदिराचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

Follow Us