
अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच या घातपातासाठी जबाबदार कोण असू शकतं यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवारांनी थेट नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवार यांनी म्हटले की, ‘हा अपघात होता की घात होता? असा प्रश्न तुम्ही केला. सर्वांची शंका आहे की हा घात होता. आजच्या सादरीकरणावरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली. कशी घडली. कुणाचं विमान होतं. ही सर्व माहिती तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतोय असं नाही. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. याबाबत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सरकारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे.’
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, डीजीसीवर विश्वास आहे. सरकारवर आरोप नाही. कुणावर आरोप नाही. अशा गोष्टी घडल्या असतील अशी शंका आहे. पोलिसांना एअरपोर्टवर परवानगी नसते. सीआयडी चौकशी करत नाही. त्यात एक्सपर्ट ओपिनियन हवं. त्यामुळे बाहेरच्या कंपन्या घ्या. तसेच ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी द्यावी. ही सरकारला विनंती आहे. सीआयडीवर आक्षेप घेत नाही. कधी कधी एखाद्या एजन्सीचं नाव दिल्यावर लोकांना वाटतं लय भारी काम. पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करणार नाही. हे त्यांचं एक्सपर्टीज नाही. हृदयाचा आजार असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे जावं लागतं. डोळ्याच्या नाही.
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘काही प्रमाणात राजकीयदृष्टीकोनातून नाही, व्यावहारिक दृष्टीकोनातून काही गोष्टी दाबल्या जात आहे. मुंबई एअरपोर्टचं सीसीटीव्ही फुटेज घेतलं नाही. बारामतीचं घेतलं. स्लो चौकशी सुरू आहे. प्रमुख नेता मृत्यूमुखी पडतो. चौकशी संथ होत असेल तर या चौकशीत गती नाही. त्यात मॅन्यूप्युलेशन केलं तर घातक होईल. व्हिएसआरच्या सर्व सर्व्हिसेस कॅन्सल करा. व्हिआयपीला धोका होऊ शकतो. सर्वांना ताब्यात घ्या.’