
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारीसुद्धा पावसाचा जोर कायम होता. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गंगापूर धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. पुण्यात पीएमपीच्या ताफ्यात नव्याने ६०० बस दाखल होत आहे. मराठीच्या मुद्यावरुन एकत्र आलेल्या शिवसेना उबाठा, मनसे आणि शिंदे सेना यांच्यात बॅनरबाजी सुरु आहे. ठाण्यातील टेंभी नाका या परिसरात उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर लागले आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
इगतपुरी ब्रेक
– धामडकी वाडी येथे दरड कोसळली
– सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने माती आणि दगडांचा ढीग आला रस्त्यावर
– रस्तावर आला मातीचा ढीग
– भावली धरणजवळ असलेल्या धामडकीवाडी येथील रस्ता बंद
– धामडकीवाडी सहित आजुबाजूच्या आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला
इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. भावली, भाम धरण पाठोपाठ वाकी खापरी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाचे दोन दरवाजे 0.36 मीटरने उघडण्यात आलं आहे. 1138 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून रिमझिम पावसानंतर आता काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. वाशिम जिल्ह्याला पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळालं आहे. आज पासून बच्चू कडू पायदळ यात्रा काढणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ गावापासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोप होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये महापालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. आणि आज दिल्ली गेट हे हरसुल टी पॉईंट या रस्त्यावर ही कारवाई सुरू आहे आणि यावेळी अतिक्रमण काढत असताना पोलीस, महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. सध्या दिल्ली गेट परिसरात ही अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त भाष्य केले आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांना लक्ष्य करणाऱ्यांना त्यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”.यावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आशिष शेलारला डोकं नाही. पहेलगाम हल्ल्यात महाराष्ट्र मधील बरेच जण गेले, जे आतंकवादी होते ते कुठे गेले, तुमच्यात एवढी हिम्मत असेल तर तपास लावावा, आणि सांगावं की ते अतिरेकी कुठे गेले, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी टीकास्त्र सोडलं.
जे अतिरेकी पळून गेले त्यांना शोधलं का नाही हे आशिष शेलार यांनी सांगावं, असेही खैरे म्हणाले.
गेल्या अनेक तासांपासून विस्कळीत झालेली मोनो रेलची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
तांत्रिक समस्येमुळे काही विलंब झाला होता. पण आता ती समस्या सोडवण्यात आली असून रेल्वे सेवा पुन्हा नीट सुरू झाली आहे.
जालना शहरातील मोकाट कुत्रे,कचऱ्याचा प्रश्न, यासह इतर विविध नागरी समस्यांना घेऊन आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेवर आखे तो खोलो स्वामी हे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट केबिनमध्ये घुसून महापालिका आयुक्तांना शहरातील समस्यांची तयार केलेली चित्रफितच दाखवत निषेध नोंदवला.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डोंबिवलीतील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले असून डोंबिवलीतील इंदिरा चौकात आंदोलन करण्यात आलं.
संजय गायकवाड यांच्या प्रतिमात्मक फोटोला चपलेने मारत निषेध व्यक्त केला.
महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास संजय गायकवाड यांना डोंबिवलीत फिरू देणार नाही, डोंबिवलीत आला तर त्यांच्या गाड्या फोडणार असा इशारा मनसेने दिला.
पंढरपुरातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पंढरपूरच्या कासेगावमध्ये ही घटना घडली आहे. घरगुती वादातून काल आषाढी एकादशीच्या दिवशी पत्नी मोनालीने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना समजताच पती म्हमाजी आसबे यांनीही आज गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डोंबिवलीतील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीतील इंदिरा चौकात मनसेनं आंदोलन केलंय. संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपलेनं मारत निषेध व्यक्त केलाय.
महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास संजय गायकवाड यांना डोंबिवलीत फिरू देणार नाही. डोंबिवलीत आला तर त्यांच्या गाड्या फोडणार, असा इशारा मनसेनं दिला.
मारकडवाडी ग्रामस्थांनी विधानभवनाच्या बाहेर EVM विरोधात आंदोलन केलं. माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर १३ हजार मतांनी विजयी झाले. जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. जानकर कमी मतांनी विजयी झाल्यामुळे मारकडवाडीचे ग्रामस्थ खुश नाहीत. विधानभवन बाहेर या ग्रामस्थांनी आंदोलन करत सरकारच्या आणि EVM च्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतलं.
“वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय 22 जुलै रोजी देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याचे सरकारतर्फे अर्ज देण्यात आले होते. वकिलांनी यावर युक्तिवाद केला. प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर देखील 22 जुलै रोजी निकाल देणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. इतर आरोपींनी देखील प्रॉपर्टी जप्त करू नये अशी न्यायालयाला विनंती केली. वाल्मिकला नाशिक कारागृहात हलवण्यासंदर्भातली मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे,” असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले.
इगतपुरी शहरात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. शहरातील वसंत पवार नगर इथल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. रहिवाशांनी भर पावसात तुंबलेल्या पाण्यात ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
निफाड (नाशिक)- नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने 43 हजार 882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, करंजगाव आणि शिंगवे या गावांना पुराचा फटका बसू नये म्हणून विसर्गात वाढ करण्यात आली. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
अहिल्यानगर – निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला असून 8500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग वाढवला आहे. प्रवरा नदीकाठच्या नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्याची गरिमा राखली जावी आणि त्याचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. काल घडलेल्या एका घटनेचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले आहेत.
पुणे आणि परिसरात खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पाणी पातळी वाढल्याने, आज सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून सध्या एकूण ६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट जास्त आहे. पुणे शहरातही सकाळपासून काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे.
इगतपुरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भावली आणि भाम धरणांनंतर आता वैतरणा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे वैतरणा धरणाची पाणी पातळी वेगाने वाढली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या महत्त्वाच्या धरणाचे पाचही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, सध्या धरणातून ५,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांच्या योजनांवर सध्या आंदोलन सुरु आहे. राज्यात खोट्यांचं सरकार आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
हिंदीच्या मुद्द्यासंदर्भातील GR रद्द झाल्यानंतर देखील आज मोर्चा… डॉ. जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध करणार… पवार, उद्धव ठाकरे, राऊत , हर्षवर्धन सपकाळ आंदोलनाला हजर राहणार…
कर्जतच्या खांडस गावात घरावर झाड कोसळलं… सुदैवाने याच कोणतीही जीवित हानी नाही…
महिलांच्या आणि पुरुषांच्या अशा वेगवेगळ्या अशा चार रांगा… सकाळी कामावर जाण्याची वेळ… घाटकोपर ते अंधेरी वर्सोवा पर्यंत कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल…
सर्व 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू… गंगापूर धान्याचा सध्या 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग… सद्यस्थितीला गंगापूर धरण 61 टक्के भरले… सर जिल्ह्यातील 7 धरण भरले 100%… धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता… जिल्ह्यातील तेरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
पंढरपूर मधील चंद्रभागा बस स्थानकावर वारकऱ्यांची मोठी गर्दी… आषाढी एकादशी नंतर पंढरपूर मधील वारकरी परतीच्या वाटेवरती… विठुरायाच्या दर्शनानंतर वारकऱ्यांना घराची ओढ….
पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण करण्यात आली आहे. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची काठीने बेदाम मारहाण करण्यात आली.
भाविक या मारहाणीत रक्तबंबाळ झालाय. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील आज सकाळी ही घटना घडली. नागपूरच्या या भाविकाच्या दंडावर आणि पाठीवर काठीने मारहाण करण्यात आली. भाविकाला झालेल्या मारहाणीमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातून शरद मोहोळ टोळीतील येथील सक्रिय सदस्याला बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. संदेश कडू असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी कडूला खराडी परिसरातून बिबेवाडी अटक केली. संदेश हा रेकॉर्ड वरील आरोपी आहे.त्यामुळे पोलीस अनेक दिवसांपासून कडूच्या शोधात होते. अखेर कडू बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. सर्व 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सध्या 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सद्यस्थितीला गंगापूर धरण 61 टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तेरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला आज 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा देण्यात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.युतीबाबत बोलण्यापूर्वी आधी मला विचारा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
वरळी NSCI डोममध्ये झालेल्या मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांनी युती संदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांमुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
रत्नदुर्ग किल्ला सनसेट पॉईंटवरून तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात बँक कर्मचारी असलेल्या तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी तिच्या मित्राविरुद्ध गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जसमिक केहर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवामान खात्याने आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कालही भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता.
पाच ते सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. यामुळे खरीप हंगामातल्या कपाशी तूर सोयाबीन आणि इतर पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. पाऊस परतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गंगापूर धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली वाढली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कंबरेच्यावर पाणी आले आहे. यामुळे गंगापूर धरणातून 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिकमधील पाच ते सहा धरणे जुलै महिन्यातच 100 टक्के भरली आहे.
इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. भावली, भाम धरण पाठोपाठ वाकी खापरी धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाचे दोन दरवाजे 0.36 मीटरने उघडण्यात आलं आहे. 1138 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.