
उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण खासदारांची म्हणजेच मतदारांची संख्या 781 आहे. दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर सरकारने काढला. मात्र, याला जोरदार विरोध ओबीसी समाजाकडून केला जातोय. हेच नाही तर मंत्री छगन भुजबळ हे थेट सरकारच्या या जीआरच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत. त्यांनी स्पष्ट म्हटले की, काढलेला जीआर रद्द करा किंवा त्यामध्ये बदल करा. यावरून मराठा ओबीसी वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. नेपाळमधील परिस्थिती अधिकच चिघळलेली आहे. नेपाळमधील स्थितीवर सामनामध्ये सविस्तर लिहिण्यात आलंय. दादरचा कबुतरखाना आता पूर्णबंद बंद करण्यात आलाय. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
नेपाळमध्ये जनरेशन-झेडच्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सोशल मीडियावरील बंदीविरोधात नेपाळमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
पंतप्रधान मोदी उद्या वाराणसीमध्ये मॉरिशसच्या पंतप्रधानांना भेटतील. दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक होईल.
पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान मोदी धार येथील ‘पीएम मित्र पार्क’चे भूमिपूजन करतील.
भारत-नेपाळ सीमेवरील शेतात सशस्त्र सीमा बल आणि नेपाळ सशस्त्र पोलिस दल संयुक्त गस्त घालत आहेत. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील पानीटँकी येथील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा केली आहे. संभाषणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मेलोनी यांच्याशी त्यांची खूप चांगली चर्चा झाली. भारत-इटली धोरणात्मक भागीदारीवर चर्चा झाली.
इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित
भुजबळ, फडणवीस एकाच व्यासपीठावर
छगन भुजबळ आणि फडणवीस यांचा मुंबई ते नाशिक एकत्र प्रवास
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
आर्थिक गुन्हे शाखेकडून शिक्षण उप संचालकांसह तीन अधिकाऱ्यांना अटक
अटक केलेल्या अधिकाऱ्यांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई
साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह अनावरण समारंभास सुरुवात
शी द फडणीस यांच्या हस्ते होणार अनावरण
मंत्री उदय सामंत, शिवेंद्रराजेभोसले, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत होणार अनावरण
पुण्यातील साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडतोय कार्यक्रम
बीडच्या गेवराई तालुक्यातील जंबुरा वस्तीवरील सोनाली वनवे या नवविवाहित महिलेचं अवघ्या दोन महिन्यातच जीवन संपलं होतं. सोनाली वनवे हिचा विवाह झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात तिच्याकडे पाच लाख रुपयांसाठी तगादा लावला जात होता, तिला त्रास दिला जात होता. यानंतर सोनाली हिचा मृतदेह घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत आढळला. मृतदेहावर अनेक जखमा होत्या. आता तलवाडा पोलिसात तीन आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील गोरेगांव बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी कार्यक्रम, इन्मेक्स एसएमएम इंडिया 2025 च्या 14 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
गोरेगाव पश्चिमेतील शालीमार इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही लोकांनी खाली उड्या मारत आपला जीव वाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल समोर आला आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याच समोर आले आहे.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. छगन भुजबळ आणि फडणवीस यांनी मुंबई ते नाशिक एकत्र प्रवास केल्याची माहितीही समोर आली आहे.
वर्धा जिल्ह्यात येलो मोजॅक, चारकोल रॉट रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीनची झाडं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे.
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जन सुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे निदर्शने करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आंदोलनात यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते
सरकार नो पीयूसी – नो फ्युएल उपक्रम राबवणार असून PUC नसेल तर पेट्रोल – डिझेल मिळणार नाही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांना एवढा त्रास असेल तर पुढच्या वेळेस त्यांना विचारुन दादा आजारी पडतील असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.
सर्वांच्या संमती नंतरच जनसुरक्षा विधेयक मंजूर केल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “माझ्याकडे सर्वांचं हजेरी पत्रक आहे. सर्वांनी या विधेयकाबाबत समर्थनच केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या संमतीनेच जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.” असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये तब्बल अडीच तास चर्चा सुरु होती. ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. बैठकीला संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते.
दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याचं म्हटलं जात आहे. तसेच दोन्ही भावांच्या अधिकृत युतीच्या घोषणेबाबत जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर यात चांगलीच गोष्ट आहे. त्यात तिसऱ्या व्यक्तीने प्रतिक्रिया का द्यावी? आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात” असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधुंमध्ये पहिली राजकीय बैठक होत आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट मनसेचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. 12 सप्टेंबर रोजी नाशिक शहर व जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नागरी समस्या हनी ट्रॅप गुन्हेगारी अवैध धंदे शेतकरी कर्जमाफी या विषयांवर सरकारच्या विरोधात जनाकोश मोर्चा काढणार. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितरित्या महायुती सरकारच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची मोर्चा संदर्भात तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरीटीचे ते उद्घाटन करतील. नाशिकच्या शिलापूर येथे सुमारे २१६ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. विद्युत मंत्रालयाने उभारलेल्या लॅबमुळे १० एमव्हीएमपर्यंतचे परीक्षण आता नाशिकला होणार आहे. स्मार्ट ऊर्जा मीटर परीक्षणही आता येथे शक्य होणार आहे. ८०० केव्ही उच्च व्होल्टेज परीक्षण सुविधा या लॅबमध्ये उपलब्ध असेल.
पंजाबच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दहशतवादी ठरवले. तसेच जर उद्या राज्यातील शेतकरी ऊस दरासाठी आंदोलन करतील तर त्यांना ही या जन सुरक्षा कायद्याच्या अडून सरकार नक्षलवादी ठरवेल अशी टीका आमदार रोहित आर आर पाटील यांनी सांगलीत बोलताना केली. सांगलीतील स्टेशन चौक येथे जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मार्फत जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यासह आमदार, माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सततच्या पराभवामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणे ही राजकीय अपरिहर्यता झाली आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा आनंद आहे. दोघांचे स्वागत आहे. पण दोघे एकत्र येण्याने महायुतीवर काही परिणाम होईल असे वाटत नाही असे भाजपचे नेते प्रविण दरेकर म्हणाले.
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या एक तासांपासून चर्चेची फेरी सुरु आहे. कौटुंबिक भेटीनंतर दोन्ही ठाकरेंमध्ये आता राजकीय भेट होत असल्याची चर्चा आहे. पालिका निवडणुकीत वाटाघाटींची ही पहिली बैठक होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते प्रसार माध्यमांशी बोलल्यानंतर वस्तू स्थिती समोर येईल.
अहवालामध्ये काही त्रुटी आहेत का, याविषयी कायदेशीर बाबी तपासून पाहत आहे. मराठा आरक्षण आंदोलन सुरु असताना अखेर जे गुन्हे दाखल झाले त्याची माहिती घेतली आहे. जिल्हाधिकारी अधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही करू. प्रक्रिया सुरु झाली घाई करण्यापेक्षा योग्य मार्गाने विषय सोडवू अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
याबाबत महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली. काम कोण करत नागरिकांना माहिती आहे. येणाऱ्या निवडणूकीत लोकं विचारपूर्वक मतदान करतील
राज्यस्तरीय प्रशासकीय काम अडतात तेव्हा काम समजून पर्याय काढणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9 कोटी 60 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मराठा आंदोलनात एकुण 254 जणांचा मृत्यू झाला होता. यातील 96 मृतांच्या नातेवाईकांना काल 9 कोटी 60 लाख रुपये वर्ग करण्यात आलेत. तर याआधी 158 मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. या आंदोलनाला आलेलं हे मोठं यश मानण्यात येत आहे.
नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब उदघाटन सोहळ्यापूर्वी श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने, भुजबळ आणि गोडसे यांच्यात टेस्टिंग लॅबवरून श्रेयवाद उफाळला आहे. भुजबळांकडून वर्तमान पत्रात जाहिराती देऊन भुजबळांचा पाठपुरावा असा उल्लेख तर हेमंत गोडसे यांच्या फलकावर हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा असा उल्लेख करण्यात आला आहे.
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9 कोटी 60 लाख रुपये वर्ग केले. मराठा आंदोलनातील एक महत्वाची मागणी पूर्ण झाली आहे. मराठा आंदोलनात एकुण 254जणांचा मृत्यू झाला होता. यातील 96 मृतांच्या नातेवाईकांना काल 9 कोटी 60लाख रुपये वर्ग करण्यात आलेत.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. संजय राऊत,अनिल परब हेही राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत.
पुणे – मेट्रो प्रवासा दरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाने महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप. 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाने मेट्रो प्रवास करताना तरुणीचे फोटो , तसेच तो वृद्ध माणूस आपल्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
वाद झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलमध्ये तरुणीचे फोटो आढळले. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेत वाटा मागण्यासाठी दाखल केलेल्या खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. न्यायालयाने संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेवा यांना संजय कपूर यांच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.
बीड- मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सुनावणी आहे. सरकारी वकील उज्वल निकम आज सुनावणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम बीडमध्ये दाखल झाले आहेत.
वसई विरार महानगरपालिकेने एका तीन मजली इंडस्ट्रीअल इमारतीची बांधकाम परवानगी अखेर रद्द केली आहे. वसई विरारमध्ये सुरु असलेल्या ED च्या छापेमारी नंतर बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणारी ही पहिली इमारत आहे. बोगस TLR जोडून बांधकाम व्यावसायिकांनी परवानगी घेतली असल्याचं उघड झालं होतं.
‘काठमांडूमधील विमानतळ बंद ठेवण्याचा कालावधी वाढवल्यानंतर, शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व उड्डाणे १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रद्द राहतील. आम्ही काठमांडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवासासाठी वेळापत्रक बदलण्यावर आणि रद्द करण्यावर १२ सप्टेंबरपर्यंत सूट देत आहोत, जी ९ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या बुकिंगसाठी लागू आहे. आमचे पथक संबंधित अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहेत आणि परवानग्या मिळताच सेवा पूर्ववत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत”, अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सकडून देण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतीबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग पालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत हरकतीवर सुनावणी होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण ते 33 प्रभागात 269 हरकती आल्या असून अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टीदेखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. ‘जन सुरक्षा’ कायद्याच्या नावाखाली सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी या कायद्याचा निषेध केला. याच निषेधार्थ राज्यभर महाविकास आघाडीतील पक्ष आंदोलन करत आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम हे बीडमध्ये दाखल झाले आहेत. ते न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमुळे सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिवाळी व छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुण्याहून राज्यातील नागपूर, लातूरसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी ३०० विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे. त्यात लातूर व नागपूरसाठी ९४ विशेष फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या गाड्या पुणे, हडपसर, खडकी स्थानकांहून रवाना होणार आहेत.
सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार. सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. आरोपींच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर देखील आज निर्णय येण्याची शक्यता.
शहराच्या मध्यवर्ती भागासाठी महत्त्वाचा असलेला भिडेपूल आज पहाटेपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद होत आहे. मात्र, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी हा निर्णय झाला असून हे काम १० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या बेडरूममध्ये छताचा स्लॅब कोसळला . मोठा अपघात टळला 1969 मध्ये बांधलेली चैतन्य इमारत जीर्णावस्थेत. पावसाने परिस्थिती बिकट तळमजल्यावर पाणी, पिण्याच्या टाकीत दुर्गंधी