
ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यानिमित्त मुंबई गिरगाव परिसरात बॅनरबाजी करण्यात आली असून, “मराठी माणसाची एकजूट हीच ताकद” असा संदेश लिहीण्यात आला आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव-राज ठाकरे, तसेच अमित व आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकलेत. अमरावतीच्या वरुड-मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वाद सुरू आहे. माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व्हाट्सअप कॉल करून धमकी दिल्याचा आरोप असून देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाला आहे. आयशर टेम्पो चालकाला फिट आल्याने हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात 1 फोर व्हीलरसह आठ ते दहा मोटर सायकल चिरडल्या आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती. मात्र सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही. मात्र अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
कर्णधार शुबमन गिलने एजबेस्टनमध्ये द्विशतकी खेळी करत इंग्लंडला बॅकफूटला ढकललं आहे. शुबमनने 21 चौकार आणि 2 षटकार मारत 311 चेंडूत 200 धावांची खेळी केली. या खेळीसह भारताने 450 पार धावांपर्यंत मजल मारली आहे.
शिवसेना युबीटीने आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. पोस्टरमध्ये लिहिले आहे- महाराष्ट्रात मराठी, मराठीसाठी ठाकरे.
महाराष्ट्रात मराठी,
मराठीसाठी ठाकरेच! pic.twitter.com/KYTtND9RxK— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 3, 2025
संरक्षणमंत्र्यांनी 1.05 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीला मंजुरी दिली आहे. ही खरेदी पूर्णपणे देशात केली जाईल. आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स खरेदी केली जातील. इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली खरेदी केल्या जातील. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदी केली जातील.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे एका स्फोटात जमियत उलेमा-ए-इस्लामचे नेते हमीदुल्लाह हक हक्कानी यांच्यासह सुमारे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 20हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
कोंढवा बलात्कार प्रकरण
पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची खात्रीदायक सूत्रांची माहिती
घरात घुसून बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं
आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू,सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आंविटकर यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले आहे. व्हीआयपी दर्शन बंद केले असल्याने तीनही मंत्र्यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन आहे.
जळगावातील पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मंत्रीपदाबाबतची जाहिरपणे इच्छा बोलून दाखविली आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रति मूर्ती सिंगापूरला निघाली आहे, महाराष्ट्रात मंडळाकडे मूर्ती पाठवली जाणार आहे. सिंगापूरात पाच दिवसाचा गणपती साजरा होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करून मूर्ती सिंगापूरला रवाना केली आहे.
कोंढवा येथील एका सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे तत्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणी केली आहे.
चोफाळा ते विठ्ठल मंदिर नो व्हेईकल झोन केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत श्री विठ्ठल मंदिरातकडे निघाले असून थोड्याच वेळात ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे घेणार आहेत.
मराठी भाषेवरून मीरा भाईंदर येथील जोधपूर स्वीट्स व्यावसायिकावर मनसे कार्यकर्त्यांनी हात उगारल्याच्या निषेधार्थ संपूर्ण मारवाडी समाज आणि व्यावसायिक संघटनांनी 3 जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. मीरा-भाईंदर- मनसेविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याबद्दल आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा मोर्चा भाजपच्या नेत्यांमुळे निघाला असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
मराठी भाषेवरून मीरा भाईंदर येथील जोधपूर स्वीट्स व्यावसायिकावर मनसे कार्यकर्त्यांनी हात उगारल्याच्या निषेधार्थ संपूर्ण मारवाडी समाज आणि व्यावसायिक संघटनांनी 3 जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. हा बंद सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहेत. याबद्दल मीरा-भाईंदर- मनसेविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याबद्दल आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” फटकवलं ते समोर आलं पण त्याची मुजोरी दिसली नाही का?” असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पीएमआरडीएने अडलेले मार्ग खुले करण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरु झाली आहे. पण यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्हाला नोटीसा दिल्या का? रस्ता कोणत्या आधारावर करताय? जागा इरिगेशनच्या नावे कधी झाली? आमच्याशी तुम्ही चर्चा करणार आहे की नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांची आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांसोबतच शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. हिंदी न बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यावसायिकाला मारहाण केली होती, ज्याच्या विरोधात आज मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
नाशिकमध्ये राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे माजी सभापती गणेश गीते, नाशिक महापालिकेतील नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, माजी नगरसेवक कान्नू ताजमी, तसेच ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विकासकामांसाठी आणि निधीच्या अडचणीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.
“हे पोलीस आमचं नाही, एसआयटी आमची नाही. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी हे सगळं षडयंत्र होतं. त्यांना बदनाम करण्यासाठी होतं. पण आता सत्य समोर येत आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणीस यांनी माफी मागितली पाहिजे. त्यानंतर नारायण राणे यांच्या मुलाने माफी मागितली पाहिजे,” असं राऊत म्हणाले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे.
“नारायण राणे यांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्याने पाहत नाही. ज्या व्यक्तीने दोन-तीन वेळा पक्ष बदलले, स्वतःचा पक्ष चालवू शकले नाहीत, जे काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या. भाजपात गेले तर तिथेही त्यांचं नीट जमत नाहीये. शिवसेनेमध्ये शेवटी गोंधळ घातला. अशा व्यक्तीला महाराष्ट्र पण गांभीर्याने घेत असेल का असं वाटतं का,” असा उपरोधिक सवाल संजय राऊतांनी केला.
“सगळ्यांचं स्वागत आहे, पण एक लक्षात घ्या, या मेळाव्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहेत. सर्वांना निमंत्रण आहे आणि जे येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो,” असं संजय राऊत विजयी मेळाव्याबद्दल म्हणाले.
नाशिक – यंदाच्या आषाढी एकादशीसाठी विठ्ठल-रखुमाईसाठी खास वस्त्र तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेच्या अनुषंगाने खास वस्त्र तयार करण्यात आले आहेत. भाजप आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी हे वस्त्र तयार केले आहेत. जांबळ्या आणि भगव्या रंगांमध्ये, शुद्ध रेशमाने हे वस्त्र तयार केले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा तत्कालीन स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने आज जळगावात रूपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे. पीडित महिलेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रदेश रोहिणी खडसे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
भोकरदन तालुक्यातल्या पारध शिवारातील मिरची उत्पादक शेतकरी मागील काही दिवसापासून चिंतेत सापडलेले आहे. मिरची या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने पारध येथील मंगेश देशमुख या शेतकऱ्याने आपल्या शेतातील जवळपास एक एकर क्षेत्रावरील लागवड केलेले मिरचीचे पीक उपटून फेकले आहे. मागच्या काही दिवसापासून वातावरणातील बदल आणि मिरचीवर बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे हे शेतकरी हैराण झाले आहे.
काल केज पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील गतिमंद मुलीवर आरोपी नानासाहेब चौरे याने बलात्कार केला. बळजबरी बलात्कार करताना पीडीतेच्या नात्यातील एका महिलेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी देऊन पळून गेला. यानंतर पीडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रात्री पोलिसांनी अटक केली आहे मात्र नानासाहेब चौरे या आरोपीने काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडला सोडण्यात यावं म्हणून टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते 11. 15 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहे. कृष्ण मंदिर ते विठ्ठल मंदिर नो व्हेईकल झोनचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृष्ण मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत चालत जाण्याची शक्यता आहे.
सगळे तुमच्यासारखे गुलाम नसतात अशी बोचरी टीका नारायण राणे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्यामुळे कोकणाचे नुकसान झाले असल्याची टीका त्यांनी केली.
5 जुलै रोजी शिवसेना-मनसेच्या मेळाव्याचं सर्वांना खुलं निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व पक्षातील मराठी लोकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
नाशिकमध्ये आज ठाकरे गटातील 3 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा ताजने, नगरसेवक प्रशांत दिवे,नगरसेवक कमलेश बोडके हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल होत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते भाजपमध्ये प्रवेश करतील.
धाराशिवच्या नळदुर्ग येथे ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे झालेल्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी बँक मॅनेजरने 25 लाख रुपये चोरीचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील लोकमंगल बँकेतील मॅनेजर कैलास घाटे याने हा प्रकार केला.
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. कणकवली आता राज्य मार्गावरती वरवडे या ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे. या मार्गावरील श्रावण ,रामगड, आचरा बेळणे, मालवण या गावांचा संपर्क तुटला आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी गावात दत्ता बांगर या तरुणाने जन्मदात्या आईचाच जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला लोखंडी पाईपने मारहाण केल्यामुळे उपचारादरम्यान सुवर्णमाला बांगर मृत्यू झाला.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अंकली फाट्यावर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून रास्तारोको केल्या प्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
जमवाजमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर आगपाखड केली आहे. नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे टीकास्त्र सोडलं आहे.
भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे:
नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…
क्लायमॅक्स असा की::
हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 3, 2025
वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे 2 मीटरने उघडले असून 7 दरवाज्यांमधून 45,825 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोंदिया जिह्यात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली असून त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे बँक मॅनेजरने 25 लाखांच्या चोरीचा बनाव केल्याचे पोलिसांकडून उघड झाले आहे. अखेर पोलिसांनी 25 लाख रुपये हस्तगत केले.
माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेतील प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
वादग्रस्त भोंदू बाबा प्रसाद तामदारचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. 1 हजारांहून अधिक नग्न व्हिडीओ समोर आले आहेत, तसेच 8 पेनड्राईव्ह आणि अनेक लॅपटॉपही पोलिसांनी जप्त केले आहेत.
मोसंबी फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढ देण्यात आली असून 6 जुलै पर्यंत पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी वंचित राहू नये यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे.
येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यानिमित्त मुंबई गिरगाव परिसरात बॅनरबाजी करण्यात आली असून, “मराठी माणसाची एकजूट हीच ताकद” असा संदेश लिहीण्यात आला आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव-राज ठाकरे, तसेच अमित व आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकलेत. या बॅनरचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.