Maharashtra News live : गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या, नवी मागणी समोर

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News live : गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या, नवी मागणी समोर
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 10:53 PM

आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे ६ वाजल्यापासून पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरले आहेत. सध्या ते मुंढवा, केशवनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाची पाहणी करत असून त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारीही आहेत. तर दुसरीकडे, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेवर आज मेगाब्लॉकचा मोठा परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला आणि टिळक नगर स्टेशनदरम्यान सुरू असलेल्या कामामुळे वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यासोबतच क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सहावा सामना होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवला आहे. तर सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी होत आहे. तसेच शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आज पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यासह देश-विदेश, महाराष्ट्रा, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Sep 2025 07:31 PM (IST)

    गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या, नवी मागणी समोर

    बीडमध्ये आज गोसावी समाजाची बैठक पार पडली. यावेळी हैदराबाद गॅझेटमध्ये आमचं एसटीतून आरक्षण आहे ते आम्हाला लागू करा अशी मागणी गोसावी समाजाच्या प्रतिनिधींनी केली आहे. आज बीडमध्ये त्यांची प्राथमिक बैठक पार पडली असून 17 सप्टेंबर रोजी त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

  • 14 Sep 2025 06:26 PM (IST)

    ‘बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी विचार सुरू’

    बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू

    बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठित होणार, मंत्री इंद्रनील नाईल यांची माहिती

    धाराशिवच्या मुरुम येथील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची इंद्रनील नाईक यांच्याकडून सांत्वनपर भेट

    कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळावं ही भूमिका  – इंद्रनील नाईक

  • 14 Sep 2025 05:55 PM (IST)

    मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    बीड: मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे झालेल्या सभेमध्ये हाके यांनी वादग्रस्त वक्तव् केले होते.

  • 14 Sep 2025 05:42 PM (IST)

    धाराशिव: ओबीसी आरक्षण जाणार म्हणून 55 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

    धाराशिव जिल्ह्यामध्ये 55 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण जाणार म्हणून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा गावात ही घटना घडली आहे. माणिकराव डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

  • 14 Sep 2025 05:27 PM (IST)

    नांदेडमध्ये बंजारा आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न

    नांदेडमध्ये बंजारा आरक्षण कृती समितीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. आता बंजारा बांधव 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत. यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केला जाणार आहे. तसेच बंजारा समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

  • 14 Sep 2025 05:14 PM (IST)

    मुस्लिम बांधव लक्ष्मण हाकेंच्या पाठीशी

     

    सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे बोलताना मुस्लिम बांधवांनी लक्ष्मण हाकेंना पाठिंबा दिला आहे. मुस्लिम बांधवांच्या ओबीसी समाजातील आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आम्ही मुस्लिम बांधव लक्ष्मण हाके सरांच्या पाठीशी आहे. लक्ष्मण हाके सरांवर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तरी तो आवाज दबला जाणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लक्ष्मण हाके यांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. हाके सरांवर गुन्हा दाखल केला तर महाराष्ट्रभर आम्ही जेलभरो आंदोलन करू असं मुस्लिम बांधवांनी म्हटलं आहे.

  • 14 Sep 2025 04:59 PM (IST)

    जप तुष्टीकरणावर नाही तर समाधानावर भर देते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    “भाजप सरकारकडे विकासाचा एकच मंत्र आहे. तो मंत्र आहे- ‘नागरिक देवो भव’. म्हणजेच, देशातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. नागरिकांना त्यांच्या क्षुल्लक गरजांसाठी इकडे तिकडे भटकावे लागू नये. गरिबांना काँग्रेसच्या राजवटीत बराच काळ त्रास सहन करावा लागला. गरिबांचा अपमान करण्यात आला. कारण काँग्रेसचे काम एका विशिष्ट वर्गाला तुष्टीकरण करून केले जात असे. त्यांना सत्ता मिळत असे. पण भाजप तुष्टीकरणावर नाही तर समाधानावर भर देते”, असं म्हणत मोदींनी भाजपचं वेगळेपण दाखवून दिलं. मोदी आसामध्ये बोलत होते.

    “कोणताही गरीब, कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, या भावनेने आम्ही काम करत आहोत. आसामध्ये आज गरिबांसाठी काँक्रीटची घरे बांधण्याचं काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत आसाममध्ये 20 लाखांहून अधिक काँक्रीटची घरे गरिबांना देण्यात आली आहेत”, अशी माहितीही मोदींनी दिली.

  • 14 Sep 2025 04:44 PM (IST)

    आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया

    आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठे विधान केलंय. पाकिस्तानसोबत सामना खेळणे हा देशाशी विश्वासघात आहे. तसेच रक्त आणि खेळ एकत्र जाऊ शकत नाहीत, असं केजरीवाल यांनी इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं.

  • 14 Sep 2025 04:25 PM (IST)

    गडचिरोली पोलिसांना मोठं यश, 2 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवाद्याला अटक

    नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ताडगावच्या तिरकामेटा वनक्षेत्रात रेकी करणाऱ्या एका सक्रिय माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याच्या अटकेवर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

  • 14 Sep 2025 04:04 PM (IST)

    … यामुळे आसामच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल- नरेंद्र मोदी

    आसाम: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या बदलत्या काळात, भारताला तेल आणि वायूला पर्याय म्हणून अधिक इंधनांची आवश्यकता आहे. असाच एक पर्याय म्हणजे इथेनॉल. आज, बांबूपासून इथेनॉल बनवण्याचा एक प्लांट येथे सुरू करण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.”

  • 14 Sep 2025 03:56 PM (IST)

    भारत पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध, नागरिकांमध्ये राग

    आशिया कपमध्ये आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध करत बेंगळुरूमध्ये लोकांनी निदर्शने केली.

     

  • 14 Sep 2025 03:46 PM (IST)

    IND vs PAK: पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी भाजपावर केली टीका

    नाशिक : आशिया कप 2025 मध्ये आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपी नेते जयंत पाटील म्हणाले की, “भाजपचे नेते दोन महिन्यांपूर्वी म्हणत होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही आणि आज ते म्हणत आहेत की आम्ही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू. त्यांचा रंग दर महिन्याला बदलत राहतो आणि म्हणूनच आपले परराष्ट्र धोरण सतत अपयशी ठरत आहे आणि जगाने हे अनुभवले आहे.”

  • 14 Sep 2025 03:32 PM (IST)

    टीम इंडियाच्या विजयासाठी विश्व हिंदू रक्षा परिषदेने केले हवन

    आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विश्व हिंदू रक्षा परिषदेने हवन आणि पूजा केली. तसेच टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानशी सामना करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे, त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे, असे विश्व हिंदू रक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय म्हणाले.

  • 14 Sep 2025 03:22 PM (IST)

    उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं

    आशिया कप 2025 मध्ये आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर, शिवसेना (यूबीटी) खासदार अरविंद सावंत म्हणतात, “…तुम्ही म्हणालात की लोकांना विचारण्यात आले की ते हिंदू आहेत की मुस्लिम, आणि जर ते हिंदू असतील तर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. 26 महिला विधवा झाल्याऐशन्या द्विवेदी (पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी शुभम द्विवेदी यांच्या पत्नी) यांचे उत्तर पाहूनही आपण सामना खेळू का? उबाठा शिवसेना गटाच्या महिलांनी ठरवले की आपण आमचे कुंकू गोळा करू आणि ते पंतप्रधान मोदींना देऊ. तुम्हाला पाकिस्तानशी खेळायचे आहे का?”

  • 14 Sep 2025 03:10 PM (IST)

    देशभक्ती फक्त तुमच्या भाषणांपुरती मर्यादित, केजरीवाल यांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

    अरविंद केजरीवाल म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजींनी अभिमानाने म्हटले होते की चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. असे दिसते की देशभक्ती फक्त तुमच्या भाषणांपुरती मर्यादित आहे. आता संपूर्ण देश विचारत आहे की ऑपरेशन सिंदूरची अंत्ययात्रा इतक्या लवकर थंड झाली की एका दहशतवादी देशासोबत क्रिकेट सामना खेळला जात आहे का? पंतप्रधानजी उत्तर द्या.

  • 14 Sep 2025 03:04 PM (IST)

    बीडमधील आत्महत्येला सरकारच जबाबदार : लक्ष्मण हाके

    बीडमधील आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. “बीडमधील ही दुसरी नाही तर तिसरी आत्महत्या आहे. आणि या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे.” गोरक्ष देवडकरांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देत लक्ष्मण हाकेंनी सरकारवर आरोप केला आहे.

  • 14 Sep 2025 02:58 PM (IST)

    धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे; नदीकाठावर मात्र पर्यटकांची हुल्लडबाजी

    धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही नदीकाठावर पर्यटकांची हुल्लडबाजी चाललेली दिसत आहे. प्रशासनाने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊनही सेल्फी काढण्यासाठी पर्यटक मात्र पाण्यात उतरताना दिसत आहेत.

  • 14 Sep 2025 02:49 PM (IST)

    वानखेडे स्टेडियमबाहेर सुरक्षा वाढवली, ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

    भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल ठाकरे गट आक्रमक झाला असून आंदोलन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वानखेडे स्टेडियमबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा इशाराही दिला होता.

  • 14 Sep 2025 02:36 PM (IST)

    पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्यातरी नको : हरभजन सिंह

    आशिया कप सुरू झाला आहे. पण पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेट सामन्याबद्दल हरभजन सिंह यांनी स्पष्टच मत मांडलं आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्यातरी नको असं हरभजन सिंह यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुरळीत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असंही हरभजन सिंह यांनी म्हटलं आहे.

  • 14 Sep 2025 01:59 PM (IST)

    धुळे जिल्ह्यातील जल संकट झाले दूर

    धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये 73 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्पापैकी आठ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यावरील जल संकट दूर झाले आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये 73 टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांमध्ये 76 टक्के जलसाठा आहे.

  • 14 Sep 2025 01:52 PM (IST)

    आहिल्यानगरमध्ये भीषण अपघात

    आहिल्यानगरमधील नगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनरच्या ब्रेक फेल झाल्यामुळे तब्बल ९ चारचाकी गाड्या उडवल्या.

  • 14 Sep 2025 01:30 PM (IST)

    गोंदियामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन

    गोंदियाच्या नवेगावबांध येथे शिवसेना ठाकरे गट यांचे ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेद नोंदवला गेला आहे.

  • 14 Sep 2025 01:19 PM (IST)

    हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुरुंदा येथील झोपडपट्टीतल्या अनेक घरात पाणी घुसल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. तर कापूस ,सोयाबीन पीके पाण्याखाली गेले आहे.

  • 14 Sep 2025 12:56 PM (IST)

    ठाकरे सेनेचे ठाण्यात आंदोलन

    भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या बाहेर महिला आघाडी कडून सिंधूर डबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येत आहे.
    शेकडो महिला पाकिस्तान आणि केंद्र सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करत आहे.

  • 14 Sep 2025 12:40 PM (IST)

    ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये

    ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो.ओबीसी विरुद्ध मराठा अतिशय संविधानशील विभागाला हात लावत आहे.कोणाच्या हातात काय कोणी काय गमावले काही समजत नाही. मात्र दोन्ही समाजात अस्वस्थ करण्यात यश आलं, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

  • 14 Sep 2025 12:20 PM (IST)

    शिवसेनेकडून भारत-पाक सामनाविरोधात आंदोलन

    आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात कांदिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रवक्ते आनंद दुबे यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात, एक महिला हातात सिंदूर घेऊन उभी आहे आणि पेटी आहे ज्यावर लिहिले आहे की ती माननीय पंतप्रधानांना सिंदूर पाठवेल. पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. आणि आजच्या भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध केला जात आहे. या आंदोलनात, क्रिकेट खेळाडू मुले हातात बॅटबॉल घेऊन उभे आहेत आणि महिला सिंदूर घेऊन उभ्या आहेत.

  • 14 Sep 2025 11:56 AM (IST)

    वंजारी समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा, ओबीसी नेत्यांची मागणी

    वंजारी समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये आमची नोंद एसटी मध्ये आहे. आमच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे, समाजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला एसटीचे आरक्षण द्या अशी मागणी केली आहे.

  • 14 Sep 2025 11:41 AM (IST)

    भारत-पाक सामन्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

    “भारत आणि पाकिस्तान मॅचला परवानगी देणं ही भारतीय जनता पक्षाची दिवाळखोरी आहे. भारतीय पक्षाचे राष्ट्रभक्त हे ढोंग आहे. BJP के पप्पा वॉर रुका सकते हे पण भारत पाकिस्तान मॅच रुका नही सकते. दिल्लीमध्ये या मॅचला आप पक्षाने पण विरोध केला आहे. दुबईत तिकिट विकले जात नाहीयेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

  • 14 Sep 2025 11:30 AM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात निषेध आंदोलन

    ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरू आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे.

  • 14 Sep 2025 11:20 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला

    नाशिक – देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ जाहिरातीवरून रोहित पवारांनी टोला लगावला आहे. ‘आम्ही बेनामी जाहिरात करत नाही, जे करतो ते खुल्लमखुल्ला करतो,’ असं ते म्हणाले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात जाहिरातीवरून टोला लगावल आहे. हातात वृत्तपत्र दाखवत फडणवीसांना रोहित पवारांनी टोमणा मारला.

  • 14 Sep 2025 11:10 AM (IST)

    धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

    धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडला असून तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तेरणा धरण अगोदरच पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी परिसरातील अनेक रस्ते बंद झाले असून पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय.

  • 14 Sep 2025 10:51 AM (IST)

    संजय राऊत भडकले

    भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याहून संजय राऊत यांनी जोरदार टीका केल्याचे बघायला मिळतंय.

  • 14 Sep 2025 10:48 AM (IST)

    अजित पवारांनी साधला नागरिकांसोबत संवाद

    अजिच पवार हे पुणे दाैऱ्यावर असून त्यांनी वाहतूककोंडीबद्दल तेथील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. पुण्यातील एक महिलेने अजित पवारांना सल्ला देखील दिलाय, ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

  • 14 Sep 2025 10:18 AM (IST)

    भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात आंदोलन

    आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात कांदिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रवक्ते आनंद दुबे यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात, एक महिला हातात सिंदूर घेऊन उभी आहे आणि पेटी आहे ज्यावर लिहिले आहे की ती माननीय पंतप्रधानांना सिंदूर पाठवेल.

  • 14 Sep 2025 10:08 AM (IST)

    जायकवाडी धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग

    जायकवाडी धरणाचे नियमित असणारे 18 दरवाजे आणि 9 असणारे जे आपत्कालीन दरवाजे आहे ते देखील उघडण्यात आलेले आहे या दोन्ही दरवाजांमधून आता 1 लाख 13 हजार 184 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

  • 14 Sep 2025 09:55 AM (IST)

    कॉफी सेंटर आणि कमी पटसंख्याची परीक्षा केंद्रे कायमची बंद होणार, बोर्डाचा मोठा निर्णय

    फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जालना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि कॉपीचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, भविष्यात कॉपी सेंटर आणि कमी पटसंख्या असलेली परीक्षा केंद्रे कायमची बंद करण्यात येणार आहेत. यासाठी विभागीय शिक्षण मंडळांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनांवर काम करत असून, यावर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

  • 14 Sep 2025 09:41 AM (IST)

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि दारु विक्रेत्यांना अजित पवारांचा इशारा

    पुण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे दौऱ्यात बांधकाम व्यावसायिक आणि दारूविक्रेत्यांना कडक शब्दात इशारा दिला. मुंढवा-केशवनगर येथील काही सोसायट्यांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी त्यांच्याकडे केली. या तक्रारीनंतर, “जर नागरिकांना समस्या येत असतील आणि बिल्डरांना फ्लॅट विकून मस्ती आली असेल, तर जे आपल्या हातात आहे ती कारवाई करा,” अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले. यासोबतच, केशवनगर आणि मुंढवा परिसरात बेकायदेशीर मद्यविक्री होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. यावर, “तुम्ही शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा,” अशी तंबी त्यांनी दारूविक्रेत्यांना दिली.

  • 14 Sep 2025 09:32 AM (IST)

    शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. चार दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज ते नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे, रोहित पवार आणि इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित आहेत. उद्या (सोमवारी) नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘लढा बळीराजाचा जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

  • 14 Sep 2025 09:21 AM (IST)

    नाशिकमध्ये यलो अलर्ट जारी, पुन्हा पावसाची शक्यता

    गेल्या पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिकमध्ये पुन्हा हजेरी लावली आहे. हवामान विभागाने शनिवार ते बुधवारपर्यंत नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः रविवार आणि सोमवारी शहरासह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी जिल्ह्यात २.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • 14 Sep 2025 09:12 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे शहरातील विकासकामांची पाहणी

    पुण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे ६ वाजल्यापासून पुणे शहराचा दौरा सुरू केला. शहरातील विविध विकासकामे आणि रखडलेल्या उड्डाणपुलांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने मुंढवा-केशवनगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाचा समावेश आहे. या पाहणी दौऱ्यात ते केशवनगर परिसरातील उड्डाणपूल, मुंढवा सिग्नल परिसर आणि गाडीतळ भागातील रस्त्यांची पाहणी करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

  • 14 Sep 2025 09:00 AM (IST)

    गोंदियात धावत्या गाडीने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी नाही

    गोंदिया शहरात बिसेन पेट्रोल पंपजवळून जाणाऱ्या एका मारुती सुझुकी डिझायर कारने अचानक पेट घेतला. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने त्वरित गाडी थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर परिसरातील दुकानदार आणि नागरिकांच्या मदतीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा परिसर वर्दळीचा असल्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • 14 Sep 2025 08:58 AM (IST)

    चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, वीजपुरवठा खंडित

    चंद्रपूर शहरात गेल्या तासाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसाच्या आधी शहरात विजांचा कडकडाट सुरू होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील इरई, वर्धा आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय, इरई धरण पूर्ण भरल्यामुळे त्याची सातही दारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत, ज्यामुळे इरई नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शहराच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्तेही बंद झाले आहेत.