Uday Samant : नाशिकमध्ये जिंकलेले गोकुळ गीते पलटी मारुन शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? उदय सामंत म्हणाले, जर..
संजय राऊत म्हणतात, आम्ही गोकुळ गीतेंना मदत केली. "ठीक आहे, कोणी काय केलं हे तासा-दीडतासात मी सांगू शकत नाही. मी विधानभवन परिसरात आहे. अधिवेशन चालू आहे. नक्की विश्लेषण करु. कशात कमी पडलो, त्या संदर्भात अहवाल तयार करु आणि मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देऊ"

विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीला झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. गिरीश महाजन समर्थक अशी ओळख असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. महायुतीत या निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेत नाशिक विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर होती. त्यांनी या निकालावर आता प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीत हार-जीत ही नक्कीच असते. जिंकल्यामुळे किंवा हरल्यामुळे दोन्ही प्रोसेसमधून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिंकल्यावर अतिउत्साहीपणा दाखवू नये, तसच हरल्यानंतर खच्चून जाऊ नये. त्यामुळे ठीक आहे, जे घडलं तो लोकशाहीतला एक भाग आहे तो आम्ही स्वीकारला आहे” असं उदय सामंत म्हणाले.
शिंदे वगळता महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात झाला या दराडेंच्या वक्तव्यावर सुद्धा उदय सामंत बोलले. “दराडे काय म्हणाले हे मी बघितलेलं नाही. मी स्वत: दराडे साहेबांसाठी पाच ते सहा दिवस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये होतो. मला असं वाटतं की, ज्या पद्धतीने तिथे मतदान झालं, पराभवाला सामोर जावं लागलं ते आम्ही स्वीकारलेलं आहे, तो लोकशाहीचा भाग आहे” असं उदय सामंत म्हणाले. “मला अजून काही कमेटं करायची नाही. आम्ही कुठे कमी पडलो, त्यांचा जो आक्षेप आहे महायुतीच्या सगळ्या घटकपक्षांनी अशा पद्धतीचं काम केलं नक्कीच लक्ष घालू, कोणकोण आहे, ते तपासून बघू. पराभव झाला, लोकशाहीचा भाग आहे, तो स्वीकारला आहे” असं उदय सामंत म्हणाले.
नाशिकच्या जबाबदारीवर उदय सामंत काय म्हणाले?
नाशिकची जबाबदारी तुमच्यावर होती, यावर उदय सामंत म्हणाले की, “जबाबदारी ही सांघिक होती. मी नाकारलेली नाही. निकालात काय प्लस, मायनस झाले हे बघावं लागेल. निकालानंतर मी विश्लेषण करुन सांगू शकेन. जे घडलं, त्यावर आत्ममंथन करु”
गोकुळ गीतेंना आणण्यासाठी विमान पाठवलय का?
गोकुळ गीतेंना आणण्यासाठी विमान पाठवलय, यावर उदय सामंत म्हणाले की, “मला आत्ताच या बद्दल कळतय. ते कोणाचं विमान आहे, या बद्दल कल्पना नाही. अधिकृत उमेवादारांचा जो पराभव झाला, त्यावर आत्मचिंतन करु”
शिंदेंच्या शिवसेनेत गोकुळ गीते दिसणार का?
“जर-तर वर माझा विश्वास नाही. जे आज घडलं ते कशामुळे घडलं, ते शोधणं गरजेच आहे. हे कशामुळे झालं त्याचं विश्लेषण करु” असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं.