
पाच जुलैला विजयी मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. दरम्यान त्याननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सरनाईक?
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होऊ शकते अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे, ही चर्चा सुरू असतानाच आता प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य सरनाईक यांनी केलं आहे, सरनाईक यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर येत आहेत. यावर देखील प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधानं करण्यात आले, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते, शिंदेंनी आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. आमच्याच आमदारांच्या तक्रारी आहेत असं नाही, सगळ्याच पक्षातील आमदार बोलतात, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता, जादूटोणा करून आमदार निवडून आले असं त्यांनी म्हटलं, त्यावर देखील सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोणा न करता आले? आणि आमचे जादूटोणा करून आले का? तुमचे लोकसभेला खासदार जादूटोणा करूनच निवडून आले होते का? असा सवाल सरनाईक यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत. आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे, असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.