
शुक्रवारी महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेत देखील भाजपने दणदणीत यश मिळवलं असून, मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. मात्र जरी मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी एकट्या भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही, त्यामुळे त्यांना महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाची मदत लागणारच आहे, त्यामुळे अशा स्थितीमध्ये मुंबईत महापौर कोणाचा होणार भाजप की शिवसेना शिंदे गट? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता अशीच स्थिती राज्यातील आणखी एक महापालिकेत पहायला मिळत आहे, मात्र तिथे वंचित बहुजन आघाडी ही किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणूकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाहीये, शिंदे शिवसेना , टीम ओमी कलानी आणि साई पक्ष यांनी तयार केलेल्या दोस्तीच्या गठ बंधनला 37 तर भाजपलाही समान 37 जागा मिळवल्या आहेत .महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा हा 39 असल्याने आता उल्हासनगर महापालिकेत कोणाचा महापौर होणार याबाबत मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे . मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आमचाच महापौर होणार असा दावा केला आहे . अशा स्थितीमध्ये आता उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी किंगमेकरची भूमिका बजावणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महापालिकेत आता शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होण्याची शक्यता आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी 37 जागा आहेत, दोन्ही पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दोन जागा दूर आहेत. अशा स्थितीमध्ये आता वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे हे दोनही उमेदवार अज्ञानस्थळी गेले आहेत, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत आता भाजपचं टेन्शन वाढलं आहे. दोन्ही पक्षांना बहुमतासाठी दोनच नगरसेवकांची आवश्यकता असल्यानं या ठिकाणी महापौरपदासाठी चुरस पहायला मिळू शकते.