Wardha : नुकसानभरपाईचे ‘असे’ आहे सूत्र..! मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्याचे काय आहे आश्वासन?
कृषीपंप आणि गावठाण याचे विद्युत फिडर हे वेगळे झाले आहेत. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा हा सोलरवर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा 12 तास लाईट उपलब्ध राहील असा अंदाज आहे.
महेश मुंजेवार, Tv9 मराठी, वर्धा : यंदा खरिपातील (Kharif Season) उत्पादनापेक्षा शासनकडून किती मदत मिळते यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना खरिपातील पिकांना करावा लागला होता. त्यानंतर पंचनामे आणि नेत्यांचे पाहणी दौरे झाले पण प्रत्यक्ष आर्थिक स्वरुपाची मदत शेतकऱ्यांपर्यंत (Farmer) पोहचू शकलेली नाही. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मदत तर दिली जाणार असल्याचा सुतोवाच तर केलाच पण एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ज्या भागात 65 मिमी पाऊस नाही पण पावसाच्या सातत्यामुळे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील मदत दिली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आश्वासन दिले आहे.
वर्धा जिल्ह्याच्या मुलभूत सोई-सुविधांसाठी 283 कोटींच्या विकास कामांचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शिवाय यावेळी लोकप्रतिनिधींनीही स्थानिक पातळीवर येत असलेल्या अडचणी मांडल्या. जलसंधारणाच्या अनुषंगाने नदी खोलीकरण, गाळ काढणे या कामांचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
कृषीपंप आणि गावठाण याचे विद्युत फिडर हे वेगळे झाले आहेत. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा हा सोलरवर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा 12 तास लाईट उपलब्ध राहील असा अंदाज आहे. याकरिता 88 कोटींचा प्रस्ताव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांचे 2 हेक्टरपर्यंत नुकसान झा्ले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. एवढेच नाहीतर 65 मिमी पावसाची अट ही शिथील करण्यात आली आहे. ज्या भागात 65 मिमी पेक्षा कमी पाऊस आहे पण त्यामध्ये सातत्य असल्याने नुकसान अधिकचे आहे त्या ठिकाणीही भरपाई दिली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री पदाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्ध्याचे पालकमंत्री पदही आहे. त्यामुळे लोकहिताची कामे करण्यावर भर राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. मुलभूत सोई-सुविधांबरोबर इतर गरजांवरही लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.