लालभडक कलिंगड खावं की खाऊ नये? तज्ज्ञांनी जे सांगितलं ते ऐकूनच घाम फुटेल
मुंबईतील कलिंगड विषबाधा प्रकरणानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कलिंगड खाणे सुरक्षित आहे का? यावर तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उन्हाळ्यात 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेले कलिंगड खाऊ नये. तसेच, गोड नसलेले लालभडक कलिंगड केमिकल युक्त असू शकते, ते टाळावे. पोलिसांचा तपास सुरू असून, व्हिसेरा अहवाल महत्त्वाचा ठरेल.

मुंबईतील पायधुनीत बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. देशभरातही कलिंगडवरून चर्चा सुरू झाली आहे. पायधुनीच्या मार्केटमधून तर कलिंगड गायब झालं आहे. कलिंगड खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? असं विचारलं जात आहे. कलिंगड खाल्ल्याने खरोखरच मृत्यू होतो का? असा सवालही केला जात आहे. साधारणपणे आपण बाजारात कलिंगड घेताना लालभडक असंच कलिंगड घेतो. लाल कलिंगड खायला गोड असतं. पिकलेलं असतं असं समजून आपण ते घेतो. पण असं कलिंगड घेणं कितपत योग्य आहे? तज्ज्ञांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
ग्रँट शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. तुषार पालवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पायधुनीतील घटनेनंतर लोक कलिंगड खाणं टाळत आहेत. कलिंगडाबाबतच्या अफवा उठल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आम्हाला याबाबत विचारलंही जात आहे. कलिंगड खाऊ की खाऊ नये? असं विचारलं जातंय? कलिंगड खाल्ल्याने खरोखरच मृत्यू होतो का? असंही लोक विचारत आहेत. साधारणपणे लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे, असं डॉ. तुषार पालवे म्हणाले.
कलिंगड खराब होण्याची शक्यता
साधारणपणे उन्हाळ्यात 6 तासांपेक्षा अधिक काळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका. कापलेलं कलिंगड उन्हाळ्यात खराब होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कलिंगड कापून ठेवू नये. कापलं तरी ते लवकरात लवकर खाऊन संपवावं. सहा तासांपेक्षा अधिक वेळ ठेवूच नये, असं तुषार पालवे यांनी सांगितलं.
लालभडक कलिंगड…
कलिंगड विकत घेताना जर कापल्यावर लाल कलिंगड दिसत असेल आणि गोड लागत नसेल तर ते कलिंगड घेऊ नका. असं कलिंगड केमिकल युक्त पिकवलेल आहे, असं समजून ते खाण टाळलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
व्हिसेरातून उलगडणार
दरम्यान, कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची पोलिसांकडून आता सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप संशयास्पद काही सापडलं नसल्याचं सांगितलं जात आहे. कलिंगड विक्रेत्याच्या चौकशीत देखील अद्याप काही संशयास्पद सापडलं नसल्याची माहिती समोर येत आहे. पायधुनीच्या घाटी गल्लीत जिथे ही दुर्दैवी घटना घडली तिथे अद्याप कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याचा इतर कोणताही प्रकार समोर न आल्याने संशयाला वाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी पाठवला असून त्याच्या अहवालात सगळं स्पष्ट होण्याचा पोलिसांचा दावा आहे.
