Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

Jayant Patil : शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चा, तर्क-वितर्क थांबलेले नाहीत. आज पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात हा विषय संपवला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला
Jayant Patil
| Updated on: Jul 18, 2026 | 2:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बडे नेते जयंत पाटील यांनी या आठवड्यात वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हजर होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड सोबत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे शरद पवार यांचा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार, जयंत पाटील महाराष्ट्राचे पुढचे उपमुख्यमंत्री अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावर जयंत पाटील यांनी खुलासा सुद्धा केला. “मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्षाला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवलय हे सांगण्यासाठी भेटलो. माझी तिथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झाली नाही” असा खुलासा केला.

तरीही राज्याच्या राजकारणात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चा, तर्क-वितर्क थांबलेले नाहीत. आज पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात हा विषय संपवला. जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “एनडीएकडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून आमची केवळ करमणूक होत आहे” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

तीन वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ घेतल्यासारखं वाटलं

अर्थमंत्रीपदाच्या चर्चांवर मिश्कील टिप्पणी करत, “माध्यमांमुळे मी तीन दिवसांत तीन वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ घेतल्यासारखं वाटलं,” असे ते म्हणाले. “महायुतीत जाण्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. आमचे आमदार शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आहेत आणि पुढेही राहतील,” असं स्पष्ट केलं. शक्तीपीठ विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपुरात आले असताना जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.

जयंत पाटील यांच्याकडे अर्थखातं संभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात 15 वर्ष सरकार होतं. त्यावेळी त्यांनी अर्थखात्याची जबाबदारी संभाळलेली. एक हुशार, अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

 

Follow Us